अमरावती : खरीप हंगामाच्या प्रारंभीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका बसला. पेरणी करूनही शेतात सोयाबीनचे अंकुर न फुटल्याने संतप्त युवा स्वाभिमान कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. प्रशासनाच्या संथ कारभाराचा निषेध करत आंदोलकांनी न उगवलेले बोगस सोयाबीन बियाणे चक्क कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलवर आणून टाकले. यामुळे काही काळ कृषी विभागात प्रचंड गोंधळ उडाला होता.
जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी यंदा विविध नामवंत कंपन्यांचे सोयाबीन बियाणे तब्बल १४० रुपये प्रति किलो या चढ्या दराने खरेदी केले होते. दोन आठवडे उलटूनही शेतात बियाण्यांची उगवण झाली नाही. ज्या ठिकाणी उगवण झाली, तिथे ती अत्यंत अल्प आणि निकृष्ट दर्जाची आहे, असा आक्षेप घेत आंदोलकांनी सहसंचालक कृषी गणेश घोरपडे यांच्या टेबलवर बोगस सोयाबीन बियाणे टाकले आणि कठोर कारवाई व मदतीची मागणी केली.
खरेदी पावत्यासुद्धा सादर यावेळी सुनील राणा, जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, संजय भारसाकळे, देवानंद राठोड, मंगेश इंगोले पाटील, जीवन सरदार, आशिष कावरे, अजय अब्रुक, सुशील गुल्हाने, गोविंद तायवाडे, अक्षय समरीत, मधुकर ढवळे, सूरज बारबुद्धे, शेखर विधे, गजानन ईसळ, कैलास बारबुद्धे, एकनाथ बारबुद्धे आदी शेतकरी उपस्थित होते.
आधीच कर्जाच्या विळख्यात असलेला शेतकरी या फसवणुकीमुळे पूर्णपणे खचला असून आर्थिक संकटात सापडला आहे.
प्रकाश साबळे,जिल्हाध्यक्ष, युवा स्वाभिमान पक्ष.
पुनर्पेरणीसाठी बियाणे मिळेना; दुहेरी संकट !
पहिली पेरणी उलटल्यामुळे एकीकडे खर्च मातीत गेला. दुसरीकडे आता दुबार पेरणी करण्यासाठी बाजारात दर्जेदार बियाणे उपलब्ध होईल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. बाजारात बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी अत्यंत चिंताग्रस्त आहेत.
प्रमुख मागण्या कंपन्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करावेत.
बाधित शेतांचे कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करावेत.
नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांना शासनाने मोफत दर्जेदार बियाणे पुरवावे.









