५५० मोबाइल क्रमांकांचे विश्लेषण; ६१ ठिकाणांवरील ‘सीसीटीव्ही’ तपासणी
खोलापूर पोलिस
ठाण्याच्या हद्दीतील धामोरी फाट्याजवळ राहुल राजू रावेकर (३५, वाठोडा शुक्लेश्वर, भातकुली, अमरावती) यांची हत्या केल्याप्रकरणी खोलापूर पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ५५० मोबाइल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण तसेच ६१ ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून या हत्येचा छडा लावला. साहिल राहुल भगत (१९, वडाळी, अमरावती) आणि पियूष रंजित गायकवाड (१९, नवसारी, अमरावती) असे अटकेतील आरोपींची नावे आहे.
२९ जुलै रोजी रावेकर हे वाठोडा शुक्लेश्वर येथून अमरावतीकडे जात होते. दरम्यान, धामोरी बसस्थानकाजवळील धामोरी-कुमागढ बोर्ड परिसरात अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या पाठीवर चाकूने वार करून त्यांची निघृण हत्या केली होती. याप्रकरणी मृताचा भाऊ नीलेश रावेकर यांच्या तक्रारीवरून खोलापूर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलिस अधीक्षक दत्ता तोतेवाड आणि दर्यापूरचे उपविभागीय
पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. पोलिसांच्या तांत्रिक पथकाने इंटरनेट आणि टीएसपी (टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर) च्या माध्यमातून ६ वेगवेगळ्या ठिकाणांहून माहिती मिळवून तब्बल ५५० मोबाइल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच घटनास्थळ आणि परिसरातील मार्गांवरील ६१ ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीत साहिल आणि पियूष यांचा हत्येत सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
हत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात
रावेकर हत्या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असली, तरी हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. राहुलची हत्या का करण्यात आली, याचे गूढ कायम आहे. दोन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना पोलिस कोठडी मिळाल्यानंतर हत्येमागील कारण आणि या गुन्ह्यातील अन्य आरोपींबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.








