भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं पुढील 5 दिवस साताऱ्याला ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असतानाच पुढील पाच दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं पुढील 5 दिवस साताऱ्याला ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला आहे. वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस कोसळण्याची शक्यता असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक 5 हजार क्युसेकवर पोहोचली आहे.
राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय : राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी पेरण्यांना वेग आला आहे. परंतु पावसाचं प्रमाण विभागानुसार कमी जास्त आहे. अशातच हवामान विभागानं पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. घाट परिसरात वादळी पावसाचं वातावरण तयार होऊन वेगानं वारे वाहू शकतात. तसेच विजांच्या कडकडाटात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे.
केरळच्या उत्तर किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा : महाराष्ट्र आणि केरळच्या उत्तर किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं कोकणासह मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदी-नाले, ओढे आणि धबधब्यांच्या परिसरात जाणं टाळावं. पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाहन चालवताना तसेच वीजेचा गडगडाट होत असताना काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
साताऱ्याला पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा : सातारा जिल्ह्याला पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार बुधवार आणि गुरूवारी घाटमाथ्यावर अतिवृष्टी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक 5 हजार क्युसेकवर पोहोचली आहे. कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर याठिकाणी पावसाचा जोर वाढत चालला आहे. त्यामुळे घाट मार्गांवर दरडी कोसळत आहेत. नागरीकांनी प्रवासापूर्वी संबंधित भागातील वाहतूक आणि रस्त्यांची माहिती घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.









