“एकांडा प्रवासी, शब्दांचा यात्रेकरी — ‘अक्षर मानव’चा डेबू राजन खान साहित्य गौरव आशुतोष जोशी यांना”

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती :
मानवी संवेदनांच्या पायवाटा शोधत, चाकोरीच्या चौकटी मोडत आणि जीवनाला नितळ शब्दसौंदर्य देणाऱ्या साहित्यिकांचा गौरव ‘अक्षर मानव साहित्य विभागा’तर्फे दरवर्षी ‘डेबू राजन खान उत्तम माणूस साहित्यिक पुरस्कार’ देऊन केला जातो. या वर्षीचा हा मान कोकणातील तरुण विचारवंत, छायाचित्रकार आणि *‘जर्नी टू ईस्ट’*चे लेखक आशुतोष जोशी यांच्या वाट्याला आला. पुण्यातील शिक्षक भवनात झालेल्या स्नेहसंवाद सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवेधक लेखक राजू परुळेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

व्यासपीठावर मराठी साहित्यविश्वातील प्रख्यात कादंबरीकार राजन खान, अक्षर मानवचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत डांगे, राज्य कार्याध्यक्ष नीलीमा शिकारखाने, राज्य संघटक आझाद जमा खान, तसेच सुजित चव्हाण यांची उपस्थिती सोहळ्याला अधिक अर्थपूर्ण ठरली.

कोकणातून जगभर, आणि पुन्हा भारताच्या मातीवर…

कोकणातील निसर्गहानीने जखम झालेल्या एका अस्वस्थ मनाने, परदेशी शिक्षण-नोकरीचे सुख बाजूला सारून 1800 किलोमीटरच्या पदयात्रेला निघालेला आशुतोष जोशी… नरवण ते विशाखापट्टणमपर्यंतच्या या यात्रेत त्याने खेड्यापाड्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांची वेदना, आणि विकासाच्या नावाखाली चालणारा पर्यावरणसंहार स्वतःच्या पावलांखाली अनुभवला.
कोकणातील मातीत जन्मलेला हा तरुण इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी गेला, तिथे कामही केले—पण मन मात्र मातीतल्या नागमोडी वाटांवरच अडकून राहिले.

“आपण दुसऱ्या देशात फुललो तरी आपल्या मातृभूमीला त्याचा काय उपयोग?” असा प्रश्न मनात धगधगत राहिला. आणि याच धगेतून झाली—देशात परतण्याची, पायी प्रवासाची, लोकांशी संवाद साधत बदल घडवण्याची सुरुवात.

“लेखन ही कृती नाही, ती उत्कटता आहे” – राजू परुळेकर

अध्यक्षीय भाषणात परुळेकर म्हणाले,
“आज समाजात अभूतपूर्व तणाव आहे. या दाट काळोखातून बाहेर पडण्यासाठी युवकांनी लिहायला, बोलायला हवे. आशुतोषसारखे लेखक खेड्यापाड्यात जन्मले—तरच खरा भारत उभा राहील. अक्षर मानव असे धगधगते लेखक शोधून समाजासमोर आणते, हे मोठे कार्य आहे.”

अक्षर मानवची ध्येयदृष्टी — ‘माणसाला माणूस जोडणारी चळवळ’

राज्य संघटक आझाद जमा खान म्हणाले,
“अक्षर मानव ही फक्त संघटना नाही, तर समाजव्यवस्था शुद्ध करण्याची चळवळ आहे. माणसामाणसातील भेद, मत्सर, द्वेष, तिरस्कार मिटवून समानतेच्या दिशेने नेणारी शक्ती आहे.”

साहित्य, पर्यावरण, शिक्षण, विज्ञान, आरोग्य, कला अशा शंभरहून अधिक विषयांमध्ये उपक्रम राबवत, राज्यभर गप्पा, कार्यशाळा, संवाद-सहवास कार्यक्रम घेणारी ही चळवळ समाजमनात संवेदना पेरत आहे, असे सुजित चव्हाण यांनी सांगत श्रोत्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले.

उत्सवाची सजावट ज्यांनी केली…

कार्यक्रमाचे संयोजन अक्षर मानव राज्य कार्यकारिणी आणि लेखिका अमृता देसर्डा यांनी केले. सूत्रसंचालन स्वतः साहित्यिक राजन खान यांनी तर आभार प्रदर्शन राज्य कार्याध्यक्ष नीलीमा शिकारखाने यांनी केले.

हर्षदा पिलाने, रश्मी घासकडवी, अभिजित सोनावणे, अमृता देसर्डा, अजिंक्य किन्हिकर, गणेश आवटे, अश्विनी वितोंडे, यमुना नाखले, आझाद खान, सुजित चव्हाण, अमित चव्हाण, तेजस्विनी देशपांडे, अरुण मापारी आदींच्या परिश्रमांमुळे कार्यक्रम अभूतपूर्व यशस्वी झाला.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013506
error: Content is protected !!