वंदे भारत ट्रेनमध्ये रोट्यांची पाकिटे प्लास्टिकसह गरम करून दिली जात असल्याचे उघड झाले आहे. प्लास्टिकमधील रसायने अन्नात मिसळत असल्याने प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची तक्रार रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेने प्रवाशांना गरम जेवण देण्याच्या नादात त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप एका प्रवाशाने केला आहे. अलाहाबाद ते दिल्ली प्रवासादरम्यान ‘वंदे भारत’ आणि ‘राजधानी’ एक्सप्रेसमध्ये रोट्या आणि कचोरीची सीलबंद प्लास्टिक पाकिटे थेट ओव्हनमध्ये गरम करून दिली जात असल्याचे समोर आले आहे.
काय आहे नेमका प्रकार?
एका प्रवाशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि आयआरसीटीसीला (IRCTC) टॅग करून जाब विचारला आहे. ‘हलका फुल्का’ रोटीच्या पाकिटावर स्पष्टपणे “थंड आणि कोरड्या जागी ठेवा” (Store in a cool & dry place) असे लिहिलेले असते. यावर कुठेही ‘मायक्रोवेव्ह सेफ’ किंवा ‘गरम करण्यास योग्य’ असे लिहिलेले नाही. प्रवाशाने जेव्हा रेल्वेतील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी ही पाकिटे थेट गरम केली जात असल्याची कबुली दिली.
आरोग्यावर होणारे परिणाम
तज्ज्ञांच्या मते, खाद्यपदार्थांचे प्लास्टिक जर मायक्रोवेव्हसाठी प्रमाणित नसेल, तर ते गरम केल्यावर त्यातील घातक रसायने अन्नामध्ये मिसळतात. प्लास्टिकमधील ‘बिस्फेनॉल ए’ (BPA) आणि ‘थॅलेट्स’ सारखी रसायने उष्णतेमुळे अन्नात जातात, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन आणि कर्करोगाचा धोका वाढू शकतो. प्रवाशांना अन्न “गरम” मिळावे या एका सोयीसाठी लाखो प्रवाशांच्या आयुष्याशी हा खेळ खेळला जात आहे.
Public Health Issue Alert 🚨
Travelling on Vande Bharat today (Allahabad → Delhi) and yesterday was travelling on Rajdhani (Delhi → Allahabad), I was served rotis/kachoris heated directly inside sealed plastic packaging. While at Rajdhani, I was hungry and so ate the hot… pic.twitter.com/gIxM4U1d5N
— Avani Bansal (@bansalavani) February 18, 2026
रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरणाची मागणी
तक्रारदार प्रवाशाने रेल्वे मंत्रालयाकडे खालील प्रश्न उपस्थित केले आहेत.
- ही पाकिटे प्लास्टिकसह गरम करण्यासाठी प्रमाणित आहेत का?
- जर असतील, तर त्याचे प्रमाणपत्र सार्वजनिक का केले जात नाही?
- सर्वच गाड्यांमध्ये हीच पद्धत अवलंबली जात आहे का?
- याला कोणी अधिकृत परवानगी दिली आहे?
अनेकदा अशा तक्रारींनंतर रेल्वे मंत्रालय आयआरसीटीसीकडे बोट दाखवते. आयआरसीटीसी कंत्राटदाराला जबाबदार धरते आणि शेवटी कंत्राटदार खालच्या दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण दाबून टाकतो. मात्र, प्रवाशांच्या आरोग्याला झालेल्या हानीची जबाबदारी कोणीही घेत नाही.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com









