अमरावती :आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी, असे नियोजन राज्य निवडणूक आयोगाने केले असून तसे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १ जुलैची अर्हता दिनांक गृहित धरीत आयोगाकडे मतदारयादी पाठविली आहे.यामध्ये अमरावती महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील शहरी व ग्रामिण भागात १९ लाख ८ हजार ६१२ मतदार आहेत. विधानसभेनंतर जिल्ह्यात ५० हजार २८९ मतदार वाढले आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात आयोगाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. विधानसभा निवडणुकीच्यावेळी जी मतदारयादी होती, ती राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुंबई येथील कार्यालयातून गेल्या महिन्यात मागितली होती. त्यावरून या यादीच्या आधारेच मतदान होणार असे म्हटले जात होते. मात्र, त्यानंतर मोठ्या प्रमाणात मतदारांची नोंदणी झाल्याने ते मतदानापासून वंचित राहू नये याकरिता आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निववडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै पर्यंतच्या याद्या केंद्रीय निवडणूक आयोगास मागितल्या आहेत. जिल्ह्यात ग्रामिण भागात विधानसभेच्या यादीत १५ लाख ३ हजार ६३ मतदारांचा समावेश होता. १ जुलैपर्यंत यामध्ये वाढ होत १५ लाख ४९ हजार ७४४ मतदार झाले आहेत. यामध्ये ४६ हजार ६३ मतदार वाढले आहेत.
तसेच नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात विधानसभेमध्ये ३२ लाख ५४ हजार ४२ मतदार असताना १ जुलै रोजी मतदार संख्या ३ लाख ५८ हजार ८६८ एवढी झाली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात वा आठ महिन्यांमध्ये ५० हजार २८९ मतदार वाढले आहेत. १ जुलैच्या मतदार यादीतील मतदारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती एका टप्यात नगरपालिका दुसऱ्या टप्प्यात तर महापालिका निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





