सरन्यायाधीश भूषण गवई : दर्यापूर येथे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी आवाहन
अमरावती : राज्य घटनेच्या ७५ वर्षाच्या कालखंडात देशाने प्रगती केलेली आहे. परंतु, खऱ्या अर्थाने सामाजिक व आर्थिक लोकशाही निर्माण करायची असेल, तर सर्वानी राज्य घटनेप्रति पूर्ण निष्ठा ठेवावी. जे मौलिक अधिकार आहेत, यांचा समेट घडवून देशातील शेवटच्या माणसाला, गरिबातला गरीब नागरिकाला जलद गतीने मुख्य प्रवाहात कसे सामावून घेता येईल, यादृष्टीने न्यायपालिका, कार्यपालिका व विधीपालिका यांनी एकत्र राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.
दर्यापूर येथील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटनप्रसंगी न्या. गवई बोलत होते. यावेळी जिल्हा पालक न्यायाधीश व नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश अनिल किलोर, पालक न्यायमूर्ती पी. एस. पाटील, नागपूर खंडपीठाचे माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे, जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर येर्लागड्डा, खासदार बळवंत वानखडे, आमदार गजानन लवटे, विधि व न्याय विभागाचे प्रधान सचिन विलास गायकवाड, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, बार कौन्शिल ऑफ इंडियाचे आशिष देशमुख यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी दर्यापूर वकील संघाच्यावतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
न्या. गवई पुढे म्हणाले, देशाच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालखंडात पार्लियामेंट, एक्झिक्युटिव्ह व न्यायपालिकेने देशाच्या घटनेला सामाजिक व आर्थिक समतेचे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने वाटचाल केली आहे. महाराष्ट्र ‘ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर ‘बाबत खूप पुढे आहे. या न्यायालयाचे इमारतीचे उद्घाटनाला दर्यापूर तालुक्याचा व दारापूरचा नागरिक म्हणून उपस्थित असल्याचा अभिमान असल्याचे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले.
डॉ. आंबेडकर यांच्या तालुक्यात कोर्ट
महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निधी उपलब्ध केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात कोर्ट नव्हते, शासनाने तेथे कोर्ट मंजूर केले व ऑक्टोबर २०२४ मध्ये तेथे भूमिपूजन केले. या इमारतीचे उद्घाटन १७ ऑगस्टला होणार आहे, असे न्या. गवई म्हणाले.
न्याय दारापर्यंत पोहोचेल…
दर्यापूर तालुक्याला थोर परंपरा लाभली आहे. संत गाडगे महाराज शेंडगावचे. त्यांचे महान कार्य सर्वांना माहीतच आहे. दादासाहेब गवई यांनी दर्यापूर तालुक्याचे नाव देशस्तरावर नेले. येथे भारताचा मुख्य न्यायाधीश नव्हे तर दर्यापूर तालुक्याचा नागरिक म्हणून उपस्थित आहे. या न्यायालयाद्वारे न्याय दारापर्यंत पोहोचेल, अशी ग्वाही न्या. गवई यांनी याप्रसंगी दिली.
व्यासपीठावर सर्व खुर्ध्या सारख्या ठेवा
व्यासपीठावरील सर्व खुर्चा सारख्या असल्या पाहिजे, कोर्टाच्या कार्यक्रमात सर्व खुर्चा सारख्या असाव्यात, याबाबतचे पत्र काढण्याची सूचना सरन्यायाधीशांनी विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव गायकवाड यांना केली. न्यायालयात खेळीमेळीचे वातावरण असले पाहिजे, खुर्ची डोक्यात जाऊ देऊ नका, अशी सर्व न्यायाधीशांना विनंती असल्याचे ते म्हणाले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





