
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला उमेदवारांची आर्त साद
श्रीकांत नाथे
अंजनगाव सुर्जी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात म्हणून ओळखल्या गेलेल्या परीक्षेचा निकाल अद्यापपर्यंत लागलेला नसून तब्बल पंधरा हजार विद्यार्थी यामुळे बाधित आहेत.जानेवारी २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची साडेसात हजार पेक्षा अधिक लिपिक व करसहाय्यक पदाची जाहिरात आली होती.सदर जाहिरातीसाठी पूर्व परीक्षा ३० एप्रिल २०२३, मुख्य १७ डिसेंबर २०२३ तर कौशल्य चाचणी ४ ते १३ जुलै २०२४ दरम्यान घेण्यात आली होती.परंतु महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, छत्रपती संभाजीनगर येथे प्रलंबित असलेल्या खटल्याचा निकालामुळे या परीक्षेचा अंतिम निकाल अद्यापपर्यंत जाहीर झालेला नाही.तब्बल १५ हजार कुटुंब यामुळे मानसिक तणावातून जात आहेत.निवडप्रक्रियेतील विलंबामुळे ७ हजार लिपिक व ४६८ कर सहाय्यक पदे प्रलंबित आहेत.यासर्व पदांवर भरती होण्याची प्रक्रिया संथ न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडली आहे ज्याचा थेट परिणाम १५ हजार उमेदवारांवर होत आहे.
एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांची मोठी संख्या महाराष्ट्रात आहे.गोरगरीब शेतकरी पुत्र आपले नशीब या स्पर्धा परीक्षेत आजमावत असतात.प्रसंगी हालाकीच्या परिस्थितीत पुण्यासारख्या खर्चिक शहरात राहून महागीचे क्लास लावून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात परंतु त्यांच्या वाट्याला हा शासकीय अनुशेषचं आल्याचे पाहायला मिळते.या सर्व गोष्टींमुळे वारंवार ठराविक विद्यार्थीचं गुणवत्ता यादीत येत असतात.त्यामुळे या सात हजार लिपिक व कर सहाय्यकांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन दिलासा देण्यासाठी उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रभर मंत्री, आमदार, खासदार इत्यादी लोकप्रतिनिधींना निवेदन देत फिरत आहेत.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी आर्त साद विविध मार्गाने विद्यार्थी घालत आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





