महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सत्ताधारी भाजपच्या खासदाराच्या मुलीची छेड काढण्यात आली होती. यानंतर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. शुक्रवारी शिवशाहीमध्ये एका तरुणीची छेड काढण्यात आली होती. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. यामुळे शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आम्हा महिलांना एक खून माफ करा, अशी मागणी महिला दिनादिवशीच केली आहे.
आपला देश गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. यामध्ये शांती आणि अहिंसा प्रतीक आहेत. शांतीचा देश म्हणून ओळखला जातो. राष्ट्रपती महोदया मी क्षमा मागून तुम्हाला एक विनंती करते की आम्हा महिलांना एक खून माफ करावा. आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात महिला असुरक्षित आहेत. महिलांवरती अत्याचाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दोन दिवसांआधीच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये बारा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला, सर्वेनुसार जगामध्ये सर्वात महिलांसाठी असुरक्षित असलेला देश म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे, असे खडसे म्हणाल्या.
जागतिक महिला दिन सगळीकडे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. एकीकडे महिला सशक्तीकरणाचे बोलले जात असताना राज्यात, देशात जागोजागी महिलांची इज्जत ओरबाडली जात आहे. महिला या सुरक्षित वावरू शकत नाहीत, अशी परिस्थिती आलेली आहे. खासदारांच्या मुलीची छेड काढली जाते, तिथे सामान्य घरातील मुलींचे, महिलांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वारगेटमधील तरुणीवर बलात्कार प्रकरणात तिच्यावरच संशय घेतला जात आहे. ती ओरडली नाही म्हणून तिच्यावर बलात्कार झाला, असे सांगण्यापर्यंत मंत्र्यांची मजल गेलेली आहे. आरोपीचे वकिलही आपल्या अशिलाला सोडविण्यासाठी तरुणीविरोधात वेगवेगळे आरोप करत आहेत.
महिला अत्याचारावरील प्रकरणे फास्टट्र्रॅक कोर्टात चालविली जात आहेत, कठोर कायदा करण्यात आला आहे, तरी देखील नराधमांना त्याची काहीच भीती नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. यामुळे महिलावर्गातून अशाप्रकारची मागणी पुढे येऊ लागली आहे.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com