येवदा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख शहरांसाठी पक्के रस्त्याचे जाळे विणून काढत असताना पाणंद रस्त्यांनी बिकट वाटेनेच शेतकरी-मजुरांना शेती गाठावी लागत आहे. दर्यापूर तालुक्यातील येवदा ते सातेगाव पाणंद रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, येवदा-भाघडी रस्त्यावरील शहानूर नदीवरील पूल केव्हा होणार, हा प्रश्न अनेक वर्षे अनुत्तरित आहे.
येवदा शेत शिवारातील अनेक पाणंद रस्त्याअभावी पावसाळ्यात शेतीची मशागत करणे कठीण होते. येवदा ते सातेगाव रस्त्यामध्ये येवदा येथील सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांना मूग, सोयाबीन, उडीद यासारखी पिके शेतातून घरी आणणे अवघड झाले आहे. ही अवस्था येवदा ते एरंडगाव रस्त्याची आहे. येवदा ते भाघडी रस्त्यावरील शहानूर नदीच्या पुलाची समस्या कायम आहे. या नदीच्या पलीकडे असलेल्या शेतजमिनी शेतकऱ्यांना व मजूर वर्गाला नदी ओलांडून शेताची मशागतीसाठी जावे लागते. पुलाअभावी येवदा येथे आजपर्यंत चार शेतकरी-मजुरांचा नदी ओलांडताना पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला. नदीवर पूल होण्यासाठी आणखी किती जीव गमवावे लागतील.
येवदा ते सातेगाव रोडकरिता अनेक लोकप्रतिनिधींकडून निवडणुकीच्या वेळी पाणंद रस्त्याचे आम्हाला आश्वासन दिले. निवडून आल्यानंतर आमच्या समस्येकडे कुणीही लक्ष दिले नाही. पावसाळ्यात शेतीची मशागत करण्याकरिता मरणयातना सहन करावे लागते. लोकप्रतिनिधींच्या शेतजमिनी अशा रस्त्याने बहुधा नसाव्यात, त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची व्यथा काय कळणार?
नरेंद्र वांदे, शेतकरी
येवदा ते भाघडी पाणंद रस्त्यावरील शहानूर नदी ओलांडून शेती मशागतीसाठी जावे लागते. पावसाळ्यात या नदीला नेहमी पूर येतो. घरी पोहोचण्याकरिता तासनतास पुराचे पाणी ओसरण्याची वाट बघावी लागते. कित्येक वर्षापासून ही समस्या कायम आहे. नीलेश गणवीर, शेतकरी
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





