मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कबुतरखान्यावरून पोलिसांनी केलेली कथित एकतर्फी कारवाई आणि स्वातंत्र्यदिनाला मांसबंदीवरून सरकारवर टीका केली केली आहे. जाणून, घ्या सविस्तर माहिती
मुंबई –: स्वातंत्र्यदिनी मांस आणि कत्तलखान्याची दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “स्वातंत्र्यदिनी सरकार लोकांचं खाण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहे. कोणी काय खावं, हे सरकार ठरवणार का?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं जन्माष्टमी आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त मांस आणि कत्तलखान्याची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. महानगरपालिकेनं दिलेल्या या आदेशानंतर आता सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे. आता याच विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील सरकारवर टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “स्वातंत्र्यदिनी मांसावर बंदी का घातली जात आहे? मी माझ्या लोकांना सांगितलं आहे की सर्व चिकन, मटण आणि मासळी विक्रीची दुकाने सुरू ठेवा. कोणावरही कोणतंही बंधन नाही. मला सांगण्यात आलं की हा १९८८ चा कायदा आहे. मला वाटतं स्वातंत्र्यदिनी तुम्ही लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहात. सरकारला नक्की काय हवं आहे? व्हेज-नॉनव्हेज असा वाद निर्माण करणं चुकीचं आहे. आपण काय खावे आणि काय खाऊ नये, हे सांगणारे सरकार कोण?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
मंगल प्रभात लोढा हे संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री- कबुतरांना खायला देण्यावरील बंदी आणि त्याविरुद्ध जैन समाजानं केलेल्या निषेधांवर राज ठाकरे म्हणाले की, “त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं. सरकारला काय हवे आहे, ते मला समजत नाही. आता त्यांनी कबुतरांच्या नावाखाली राजकारण करायला सुरुवात केली आहे. पुढे यात आणखी कोणते प्राणी आणतील, हे मला माहित नाही. मंगल प्रभात लोढा हे केवळ एका समुदायाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहेत. कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांबाबत वैद्यकीय तज्ञ सातत्यानं इशारा देत आहेत. धार्मिक आणि भावनिक आधारावर कारवाई करण्याऐवजी सरकारनं हे लक्षात घेतलं पाहिजे.”
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





