मातोश्री 2 कुणाच्या कमिशनवर उभी राहिली, याचं उत्तर आधी द्या. उद्धव ठाकरे हे लुटारूंचे सरदार आहेत, त्यामुळे राऊतांनी कमिशनच्या बाता मारू नयेत, असंही बन म्हणालेत.
मुंबई – आगामी काळात महापालिका निवडणुकीत आम्ही भ्रष्टाचाराची हंडी फोडणार आहोत, असं शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत शिवसेना (ठाकरे) गटावर अप्रत्यक्षरीत्या टीका केलीय. यावर आता उबाठा गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, मुंबई आणि ठाण्याला लुटणारे सरकारमध्येच आहेत. सरकारमधील लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. तरीसुद्धा ते आज सरकारमध्ये आहेत. आमच्या काळात मुंबई पालिकेत 90 हजार कोटींच्या ठेवी ठेवल्या होत्या, पण त्याची लूट तुमच्या सरकारने केली आहे, असा पलटवार खासदार संजय राऊत यांनी केलाय. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते, परंतु आता राऊतांच्या टीकेला भाजपानेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
तुम्हाला महाजोकर करून घरी बसवलं : दरम्यान, भाजपाने राऊतांच्या टीकेला उत्तर दिलंय, तुमचे मालक उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीवेळी म्हणाले होते की, ‘एकतर तू राहशील किंवा मी राहीन’. मात्र जनतेने उद्धव ठाकरेंना महाजोकर करून घरी बसवले आणि देवेंद्र फडणवीस जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले. तसेच उबाठा गटाच्या 52 पत्त्यांच्या गड्डीत सर्वच पत्ते जोकरचे आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी महाजोकराची भाषा करू नये. ही वस्तुस्थिती माकडछाप संजय राऊत यांनी ध्यानात घ्यावी, अशी टीका भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर केलीय.
मातोश्री 2 कुणाच्या कमिशनवर उभी? : पुढे बोलताना बन म्हणाले की, मातोश्री 2 कुणाच्या कमिशनवर उभी राहिली, याचं उत्तर आधी द्या. उद्धव ठाकरे हे लुटारूंचे सरदार आहेत, त्यामुळे संजय राऊतांनी कमिशनच्या बाता मारू नयेत. मृताच्या टाळूवरील लोणी खाणारे जर कोणी असतील तर ते स्वतः संजय राऊत आहेत, अशी बोचरी टीका भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर केलीय. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाचे थर लावत आहेत आणि भ्रष्टाचाराची हंडी फोडताहेत. त्यामुळेच तुम्हाला त्याची झळ बसत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत खरा महाजोकर तुम्ही आणि तुमचा गटच आहे, हे मुंबईकर आणि मराठी माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असं बन यांनी म्हटलंय.
म्हणून तुम्हाला बोंबा माराव्या लागल्या…: माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरताना राऊतांना थोडी लाज वाटली पाहिजे. नारायण राणेंच्या कर्तृत्वामुळे शिवसेना उभी राहिली आणि आज तुम्ही अस्तित्वात आहात. त्यामुळं त्यांच्यावर टीका करताना दहा वेळा विचार करावा. महाराष्ट्रात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला शिमगा करायला भाग पाडले. तुमचा पराभव झाला म्हणून तुम्हाला दोन्ही हातांनी बोंबा माराव्या लागल्या आणि जनतेनं तुम्हाला घरी बसवले. आता 2029 ची वाट पाहू नका, येणाऱ्या पालिका निवडणुकीतच मुंबईकर तुमच्या बडबडीला कंटाळून तुमच्या तोंडाला बूच लावतील, अशी टीका नवनाथ बन यांनी राऊतांच्या 2029 च्या कोकणातील भविष्यवाणीवरून केलीय.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





