तिवसा : तालुक्यातील सार्सी गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर या पावसाचा मोठा परिणाम झाला असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. नाल्याचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अधिकच दयनीय झाली आहे. पिके हिरवीगार दिसत असली तरी सोयाबीनच्या शेंगा कोमेजून पडू लागल्या आहेत. कुणाच्या शेतात पूर्ण पीक पिवळसर होऊन लागलेल्या शेंगाही गळाल्या आहेत. शेतकऱ्यांनी एकरी तब्बल १५ हजार खर्च करून मेहनतीने उभे केलेले पीक आता पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सार्सी परिसरासोबतच नाल्यालगत असलेल्या शेंदुरजना बाजार येथील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रभाकर भगत यांच्या शेतात नाल्याचे पाणी घुसल्याने सोयाबीनचे संपूर्ण पीक पिवळसर पडले असून शेंगा गळून पिके निकामी झाली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे डेहणी गावासह तालुक्यातील इतर अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. पिके हातचे गेल्याने हंगाम हातातून निसटला आहे. या सगळ्या परिस्थितीवर शासन आणि कृषी विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी. तसेच शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर हरभऱ्याचे बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सरपंच शीतल योगेश मोहोड यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी संपर्क साधावा – सद्य स्थितीत आमच्या विभागाकडे येलो मोझेंक या रोगासंबंधी शेतकऱ्यांची कोणतीही लेखी तक्रार आलेली नाही. तरीही शेतकऱ्यांच्या हितासाठी विभागामार्फत सतत जागृती मोहीम राबविली जात आहे. व्हॉट्सअॅप ग्रुप, विभागाचे अधिकृत चॅनल व जाहिरातींच्या माध्यमातून पूर्वसूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी जरा सतर्क राहून पीक निरीक्षण करावे व अडचण आल्यास त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा. -हेमलता इंगळे कृषी अधिकारी, तिवसा
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





