पालकमंत्र्यांना विचारण्याऐवजी काँग्रेसनेच करावे चिंतन
अमरावती : नेहरू मैदानप्रकरणी भाजपची भूमिका स्पष्ट आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत विचारणा करण्याचा प्रश्नच येत नाही. सायन्स कोअर मैदान, दसरा मैदान वा वलगाव मार्गावरील अॅकेडमिक ग्राऊंड या सर्व मैदानांचे जतन, संवर्धन झाले पाहिजे हीच रोखठोक भूमिका आहे, असे बुधवारी पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेतून मांडले.
महापालिका इमारत नेहरू मैदानात बांधून मूळ जागेवर व्यापारी संकुल बांधण्यात येणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यावर खा.डॉ अनिल बोंडे यांनी मैदाने वाचविण्याची भाजपाची अधिकृत भूमिका जाहीर केली. दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेहरू मैदानात कुठलेही बांधकाम होणार नाही, असा ठोस निर्णय जाहीर केला.
या विषयावरून काँग्रेसने मंगळवारी पत्रपरिषेदत आ. खोडके दाम्पत्याने पालकमंत्री बावनुकले यांच्या नावाचा उल्लेख करून जनतेची दिशाभूल केली, असा आरोप केला आणि आमदारांकडून भाजपने माफीनामा मागावा, असा केविलवाणा प्रयत्न चालविला. खरे तर काँग्रेसनेच खोडके दाम्पत्याशी चर्चा करावी. भाजपला ओढण्याची केविलवाणी आदळआपट थांबवावी, असा सल्ला प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी दिला आहे.
महापालिका ताब्यातील जागांवर व्यापारी संकुल बांधून डल्ला मारणारा भूमाफिया यांना कोणाचा आशीर्वाद, जनहिताच्या वास्तूंवर कोण कमाई करतोय, नेहरू मैदानावर इमारतीसाठी छुपेपणाने कोण कामाला लागले, अशी प्रश्नांची सरबत्ती भाजपने केली. पत्रकार परिषदेला शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, शिवराय कुळकर्णी, किरण पातूरकर, प्रा. रवींद्र खांडेकर, राधा कुरील, किरणताई महल्ले, सचिन रासने, बादल कुळकर्णी, ललित समदुरकर उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





