
बहुतांशी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन यंत्रणेचे फायदे आणि वापर माहिती आहे. याचबरोबरीने आता माहिती तंत्रज्ञानाचा वापर ठिबक सिंचनाच्या नियोजनासाठी करता येणे शक्य आहे. इस्राईलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे पाणी व्यवस्थापनासाठी जीएसआय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
या यंत्रणेद्वारे स्मार्ट मोबाइलचा वापर करून पिकाला खत आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन करता येते. यामध्ये अत्याधुनिक कंट्रोलरमध्ये इंटरनेटचा वापर करून एका ग्लोबल सर्व्हरच्या माध्यमातून शेतामध्ये इंटरनेटवर चालणारा कंट्रोलर आणि शेतकऱ्याचा मोबाइल जोडला जातो.
शेतकऱ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार शेतात संचलित होणाऱ्या खत आणि पाणी व्यवस्थापनेची सर्व माहिती स्मार्ट फोन किंवा संगणकामध्ये आवश्यक वेळेत पाहता येते. त्यामध्ये गरज भासल्यास कुठूनही बदल करता येतो.
शेतातील पंप, विद्युत उपलब्धतेनुसार वेगवेगळ्या शेतामध्ये पुरवठा करण्यासाठी खत, पाणी यांची मात्रा आदी गोष्टींचे निरीक्षण व नियंत्रण मोबाइलद्वारे करता येते. या तंत्रज्ञानामुळे पिकाची पाणी आणि खताची गरज तंतोतंत पुरवली जाते.
जीएसआय प्रणालीचा वापर :सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ठिबक सिंचन प्रणालीचे नियंत्रण शेतकऱ्याला स्वतः करावे लागते. यामध्ये नियोजनाचा खूप अभाव असतो. पिकाला लागणारे पाणी, खतांची गरज ही पीक वाढीची अवस्था आणि वातावरणातील तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, सूर्यप्रकाशाचा दिवसातील कालावधी या बाबींवर अवलंबून असतो.
मुळांच्या कक्षेत पाणी राहण्याच्या क्षमतेनुसार, मातीच्या प्रकारानुसार पिकाला लागणारे पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. असे नियोजनबद्ध पाणी व्यवस्थापन माणसाद्वारे करण्यात अनेक अडचणी येतात. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या जीएसआय प्रणाली तंत्रज्ञानाद्वारे हे गुंतागुंतीची नियोजन सहजपणे करता येते.
शेतात असणाऱ्या व्हॉल्व्हऐवजी इलेक्ट्रिकल व्हॉल्व्ह वापरून त्यांना जीएसआय कंट्रोलरला जोडण्यात येते, तसेच पंप स्टार्टर, खतांची टाकी हे घटकसुद्धा जीएसआय कंट्रोलरला जोडण्यात येतात. यामुळे पंप व विद्युत मोटार चालवून खते, पाणीपुरवठा स्वयंचलित पद्धतीने केला जातो.
यासाठी मोबाइल किंवा इंटरनेटद्वारे आपणास आवश्यकतेनुसार प्रोग्रॅम तयार करून ठेवता येतो. यानुसार खत व पाणी व्यवस्थापन स्वयंचलित पद्धतीने होते. त्या संदर्भातील सर्व तपशील ग्लोबल सर्व्हरमध्ये पाच वर्षांसाठी संग्रहित केला जातो. ज्याचा वापर शेतकरी आवश्यकतेनुसार करू शकतात.यंत्रणा काही कारणास्तव (जसे की, अपुरा पाणीसाठा, विद्युत प्रवाहातील खंड, शेतात फुटलेला पाइप इत्यादी) कार्यान्वित न झाल्यास त्याची माहिती मोबाइल तसेच ई-मेलद्वारे मिळते. या यंत्रणेचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा आहे. या यंत्रणेत आर्द्रता सेन्सर लावता येणे शक्य आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना शेतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी जास्त वेळ घालविण्याची गरज पडणार नाही.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






