प्रीतीताई बंड यांच्या नेतृत्वात शिवसेनेची विभागीय आयुक्त कार्यालयात धडक
अमरावती : दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. महागडी बि-बियाणे खरेदी करून शेतात पेरणी केली. परंतु सततच्या पावसामुळे शेतकर्यांच्या हातात काही येईल, असे दिसत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेती पिकाचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना हेक्टरी 40 हजार रूपयांची मदत सरकारने द्यावी, यामागणीसाठी शिवसेना नेत्या प्रीतीताई बंड यांच्या नेतृत्वात शिवसेनेने विभागीय आयुक्त कार्यालयात गुरूवारी (दि. 5) धडक दिली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना दिले.
शेतात पीक पेरणी झाल्यानंतर दोन महिन्यांपासून सतत पाऊस सुरू आहे. पीक उभे झाल्यानंतर शेतात निंदन, खुरपण, फवारणी करण्याची उसंत पावसाने दिली नाही. काही भागात शेतात पावसामुळे तलाव साचले. सोयाबीन पीक पिवळे पडले आहे. हातचा पैसा गेल्यानंतरही उत्पन्न होणार नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेती पिकाचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना हेक्टरी 40 हजार रूपयांची मदत देण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. शेतकर्यांना तातडीने मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेच्यावतीने निवेदनातून दिला आहे.
निवेदन देताना शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रीतीताई बंड सहसंपर्क प्रमुख नाना नागमोते, भातकुली तालुकाप्रमुख मनोहर बुध, उपतालुका प्रमुख उमेश घुरडे, उपजिल्हाप्रमुख प्रवीण अळसपुरे, श्रीनिवास सरडे, विश्वास वानखडे, रवी काळबांडे, संजय विघे, रघुनाथराव वानखडे, पांडुरंग बगाडे, विजय कडू, अय्याजभाई, नितीन ठाकरे, प्रदीप गौरखेडे, नीलेश जामठे, मिथुन सोळंके, श्याम कुचे, अनिल मोहोड, योगेश साबळे, रवी भटकर यांच्यासह अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






