मेळघाटात बालमृत्यू व मातामृत्यूच्या दरात लक्षणीय घट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

शासकीय यंत्रणेचा दावा
आरोग्य सेवा पुरविण्यास प्रशासनाचा पुढाकार
भरारी पथकाने दिले मोलाचे योगदान

अमरावती  : जिल्ह्यातीलधारणी आणि चिखलदरा तालुक्यातील मेळघाट भागावरील बालमृत्यू आणि मातामृत्यूचा डाग दशकभरानंतर प्रशासनाच्या शर्थीच्या प्रयत्नाने हटला आहे. गेल्या कालावधीत जिल्हा प्रशासनाच्या विशेष लक्षामुळे आरोग्यसेवा परिणामकारक राबविण्यात येत आहे, तसेच सेवेवर अंकुश ठेवण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती करण्यात आल्याने आरोग्य सुविधा आणि सेवांच्या दर्जात सुधारणा झाली आहे.

गेल्या दहा वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास करून मेळघाटात ‘मेळघाट मिशन २८’ राबविण्यात आले आहे. यात प्रामुख्याने जिल्हा प्रशासनाच्या मदतीने उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रुग्णालय, ११ प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध सुविधा, ७ फिरती आरोग्य पथक, ६ प्राथमिक आरोग्य पथक, ९३ उपकेंद्र, २२ भरानी पथकांमार्फत आरोग्यसेवा देण्यात आली. परिणामस्वरूप २०१३-१४ मध्ये ३३८ असणारा बालमृत्यू हा सन २०२३- २४मध्ये १५६ वर आला आहे, तर दहा वर्षापूर्वी १४वर असणारा मातामृत्यू दर हा ५ वर आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे उपजत मृत्यू १३४ वरून ७९ वर आणण्यात आले आहे.

मातामृत्यू आणि बालमृत्यू जाणीवपूर्वक कमी करण्यासाठी मेळघाट क्षेत्रात गरोदरमाता, स्तनदा माता, बालकांना स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दर १५ दिवसांनी चक्राकार पद्धतीने ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विशेष तपासणी करण्यात येत आहे.

अतिजोखमीच्या बालकांची जबाबदारी बालउपचार केंद्र आणि पोषण संवर्धन केंद्रावर सोपविण्यात आली आहे. सन २०२४-२५ मध्ये ऑक्टोबर अखेर २५ बालउपचार केंद्रामध्ये १२७ बालकांना भरती करण्यात आले. यात ५४ मुलांमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. पोषण संवर्धन केंद्रात ऑक्टोबर अखेर ३८१ बालकांची भरती करण्यात आली. यात १९७ बालकांमध्ये सुधारणा झाली आहे.

मातामृत्यू आणि बालमृत्यूला पायबंद घालण्यासाठी १ जानेवारी २०२२ पासून ‘मेळघाट मिशन २८’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रसूतीच्या २८ दिवस अगोदर आणि नवजात अर्भकास २८ दिवस अंगणवाडी सेविका, आशामार्फत दैनिक भेटी देण्यात येते. यामुळे संस्थात्मक प्रसूतीची टक्केवारी ९६ पर्यंत पोहोचली आहे.

मेळघाटातील अतिसंवेदनशील गावांमध्ये आरोग्यसेवा पुरविण्यासाठी नवसंजीवनी योजनेंतर्गत धारणी तालुक्यात १२ आणि चिखलदरा तालुक्यात १० अशी २२ भरारी पथके कार्यान्वित आहेत. भरारी पथकात मानसेवी वैद्यकीय अधिकारी अखंडित सेवा देत आहेत. त्यामुळे माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात भरारी पथके मोलाचे सहकार्य देत आहेत.

मानव विकास कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर अखेर १०५ शिबिरे प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आयोजित करण्यात आली आहे. यात तज्ज्ञांमार्फत ४३०० गरोदर माता, ६७० जोखीमग्रस्त माता, ७३७ स्तनदा माता आणि ६ महिन्यापर्यंतचे सर्व बालके, तसेच कमी वजन असलेले ७७१ बालकांची तपासणी करण्यात येऊन उपचारात्मक कार्यक्रम राबविण्यात आले. यातील सर्वांना संदर्भ सेवा पुरविण्यात आल्या आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013564
error: Content is protected !!