
अमरावती : यंदाच्या उन्हाळ्यात उष्म्याने कहर केला आहे. सकाळी नऊपासूनच उन्हाची तीव्रता वाढत असून, भर दुपारी घराबाहेर पडणे मुश्कील होत आहे. दिवसभर उन्हाच्या प्रचंड झळांनी काहिली होऊ लागली आहे. तर किमान तापमानातही वाढ झाल्याने नागरिकांना रात्रीची झोप घेणेही असह्य होऊ लागले आहे.
गत काही दिवसापासून तापमानात सतत वाढ होत आहे. पारा चाळीशीकडे गेल्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाची दाहकता वाढली आहे. मार्चपासून उन्हाच्या प्रचंड झळा जाणवू लागल्या आहेत. अमरावती शहरासह अमरावती ते नागपूर, अमरावती वरुड यासह शहरातील मार्गाचे रुंदीकरण व दर्जा उन्नती कामावेळी रस्त्यावरील सर्वच वृक्ष हटविण्यात आले आहेत. त्यामुळे सावलीसाठी झाडेही उरलेली नाहीत. डांबरी रस्त्याच्या तुलनेत सिमेंटचा रस्ता उष्णता साठवून ठेवत असल्याने या रस्त्यावरून जाताना झळा अधिक जाणवून येत आहेत. उन्हाच्या चटक्यांमुळे प्रवास नकोसा झाला आहे. भर दुपारी रस्त्यांवरील वाहतूक मंदावत आहे. तर महत्त्वाच्या बाजारपेठेतही शुकशुकाट जाणवत आहे. विविध कामांच्या निमित्ताने घराबाहेर पडलेले वृक्षाच्या सावलीचा आसरा घेत आहेत. उन्हापासून बचावासाठी दुचाकीस्वार हेल्मेट, स्कार्प, रुमाल बांधूनच बाहेर पडत आहेत. यातूनही घामाघूम होऊन रसवंतीगृह, शीतपेयांची ठिकाणे शोधत आहेत. सर्वत्र पंखे, कुलर तसेच एसीचा वापर वाढल्याने विजेची मागणीही मोठी वाढली असून वीज बिलात दुपटीने वाढ झाली आहे. कमाल तापमानाने चाळीशीकडे मजल मारली आहे.
दिवसभर उष्णतेच्या झळांनी लोक हैराण झाले असतानाच किमान तापमानही वाढू लागल्याने अनेकांची रात्रीची झोपमोड होत आहे. आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
दिवसभर उष्मा दिवसभर उष्मा वाढत असून अधून मधून आभाळ भरून आलेले असे वातावरण गत आठवड्यात शहरासह जिल्हाभरात दिसून येत होते आहे. परंतु, पाऊस पडत नसल्याने वातावरणातील तापमान कमी होत नसल्याने नागरिकांची दैना होत आहे.
शीतपेय, मागणी वाढली ४० अंशाच्या पाऱ्यामध्ये कामानिमित्त बाहेर पडणारे अमरावतीकर, विद्यार्थी दाहकता शमविण्यासाठी रसवंती, ज्यूस सेंटरवर जाऊन शीतपेयाचा आस्वाद घेत आहेत. ती संख्याही वाढली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






