शेतकऱ्याचे मोठे नुकसान, कांदाही जळाला, पोलिसात तक्रार
नांदगाव पेठ : नजीकच्या जामठी शिवारातील शेतात कृषी साहित्याला अज्ञात भामट्याने आग लावून तेथून पळ काढला. यामध्ये एका खोलीत असलेले शेतीचे साहित्य, तसेच साठवून ठेवलेला कांदाही आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन त्याचा कोळसा झाला. याबाबत शेतकरी संजय कोठारी यांनी नांदगाव पेठ पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, शेतकरी संजय कोठारी यांचे जामठी शिवारात पाच एकर शेत असून, त्या ठिकाणी पक्के बांधकाम असणारी खोली आहे. त्या खोलीमध्ये शेतीला लागणारे साहित्य, तसेच कांदाही ठेवण्यात आला होता. ४ मे रोजी सायंकाळच्या सुमारास शेतातील खोलीला आग लागल्याने सर्वत्र धूर पसरला होता. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला आणि घटनेची माहितीही दिली. कोठारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खोलीमध्ये ठेवलेले स्प्रिंकलर, टीव्ही, बारदाना, खुर्चा, टेबल, गाद्या, तसेच कांद्याचे कट्टे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. याबाबत दुसऱ्या दिवशी संजय कोठारी यांनी पोलिसांत अज्ञाताविरोधात तक्रारी नोंदविली असून पुढील तपास नांदगाव पेठेचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





