प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांवर अतिरिक्त भाषांचे ओझे लादणे योग्य नाही, असे म्हणत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी हिंदी सक्तीला विरोध दर्शविला आहे.
पुणे– माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिलीपासून हिंदी भाषेला विरोध केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. पहिलीपासून हिंदी विषय शिकविण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांनी गुरुवारी भूमिका स्पष्ट केली.
गेल्या आठवड्यात राज्य सरकारनं मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल, असे सुधारित आदेश जारी केले. त्यामुळे राज्यभरात सरकारच्या निर्णयला विरोध होत आहे.
माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी म्हटलं,” महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीची करू नये. जर एखादी नवीन भाषा शिकविण्याची सुरू करायची असेल तर ती पाचवीनंतरच भाषा शिकवावी. प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीची करू नये. पाचवीनंतर हिंदी सुरू करण्यास कोणताही आक्षेप नाही. देशातील एक मोठा वर्ग हिंदी बोलतो. या भाषेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं कोणतंही कारण नाही.”
- शरद पवार यांनी प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित केलं. ते म्हणाले, ” मुलांना पाचवीनंतर हिंदी शिकण्याची आवश्यकता आहे की नाही, हे ठरवण्याचा पालकांना अधिकार असावा. मुले सुरुवातीच्या टप्प्यात भाषेचं ओझं किती सहन करू शकतात, याचं विश्लेषण करणंदेखील महत्त्वाचं आहे.”
जर आपण दुसऱ्या भाषेचा भार विद्यार्थ्यांवर टाकला तर या प्रक्रियेत मातृभाषा बाजूला पडेल. ते योग्य नाही. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा करण्याचा आग्रह सोडून द्यावा-राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रमुख, शरद पवार
शरद पवार यांचे ठाकरे बंधुच्या भूमिकेला समर्थन- भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार हे भाषेच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, “शिवसेनेचे (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांचे चुलत भाऊ, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करतो. तसेच मराठी भाषिकांनी या विषयावर एकत्र येणं चांगलं आहे,” अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





