राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)ची एक टीम जुलैच्या पहिल्या आठवड्यात कवल व्याघ्र प्रकल्पा(KTR)ला भेट देऊन क्षेत्रीय तपासणी अन् अधिवास तयारीचा आढावा घेण्याची शक्यता आहे.
हैदराबाद : तेलंगणातील वाघांची संख्या पुन्हा वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्राच्या मदतीनं प्रोजेक्ट टायगर अंतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून वाघांना कवल व्याघ्र प्रकल्पात आणण्यात येणार असून, महाराष्ट्राकडून त्याला हिरवा कंदील मिळाला आहे. तेलंगणाच्या औपचारिक विनंतीनंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे, कारण सध्या कवल अभयारण्यात एकही निवासी वाघ नाही. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)ची एक टीम जुलैच्या पहिल्या आठवड्यात कवल व्याघ्र प्रकल्पा(KTR)ला भेट देऊन क्षेत्रीय तपासणी अन् अधिवास तयारीचा आढावा घेण्याची शक्यता आहे.
कवल एक समृद्ध जंगल, पण वाघ नाहीत : 2012 मध्ये स्थापन झालेल्या आणि 2015.39 चौरस किमीमध्ये पसरलेल्या कवल व्याघ्र प्रकल्पाने मंचेरियल, निर्मल, आदिलाबाद आणि कुमुराम भीम आसिफाबाद जिल्ह्यांचा काही भाग व्यापला आहे. घनदाट जंगलाबरोबरच हरीण, सांबर आणि नीलगायीसारखे मुबलक शिकार असूनही, कवलमध्ये वाघांची संख्या स्थिर नाही. कधी कधी शेजारच्या महाराष्ट्रातून वाघ इथे येतात परंतु कालांतराने ते तिथून निघून जातात.
ताडोबा ते कवल हे मोठे स्थलांतर : तेलंगणाच्या आसिफाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्राच्या ताडोबा अभयारण्यात 40 हून अधिक वाघ आहेत, तर जवळच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात 20 हून अधिक वाघ आहेत. अलिकडच्याच एका पत्रव्यवहारात तेलंगणाचे मुख्य वन्यजीव वॉर्डन एलुसिंह मेरू यांनी त्यांच्या महाराष्ट्र समकक्षांना कवल येथे काही वाघ स्थलांतरित करण्याची औपचारिक विनंती केली होती. महाराष्ट्रानेही त्यास सहमती दर्शविली आहे. तेलंगणाने दोन वर्षांपेक्षा जास्त वयाचे किमान एक नर आणि दोन मादी वाघांचा समावेश असलेले पाच वाघ मागितले आहेत, जे जंगलात स्वतंत्रपणे जगू शकतील. याची तयारी करण्यासाठी कवलच्या मुख्य क्षेत्रात असलेले म्हैसमपेट आणि रामपूर ही गावे सुमारे 20 किमी अंतरावर स्थलांतरित करण्यात आली आहेत, ज्यामुळे येणाऱ्या वाघांना त्यांचे अधिपत्य स्थापन करण्यासाठी जागा मोकळी झाली आहे.
पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या यशाने प्रेरित : मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पातील यशस्वी वाघांच्या स्थलांतरातून तेलंगणातील अधिकारी प्रेरणा घेत आहेत. 2009 मध्ये पन्नामध्ये एकही वाघ नव्हता, तेव्हा राज्यातील इतर जंगलांमधून चार वाघांचे स्थलांतर करण्यात आले. आज पन्नामध्ये 50 हून अधिक वाघ आहेत. तेलंगणालाही या यशाची पुनरावृत्ती करण्याची आणि येत्या काही वर्षांत कवलला मोठ्या वाघांसाठी एक समृद्ध अधिवास बनवण्याची आशा आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





