शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
अमरावती : कृषी निविष्ठात फसवणूक झाल्यास शेतकऱ्याचा हंगाम वाया जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची हयगय करू नका, अशा दुकानदारांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिले.
पालकमंत्री यांनी कृषी विभागाचे अधिकाऱ्यांचा दीड तासापर्यंत चांगलाच क्लास घेत नियोजनाचे धडे दिले. बैठकीला आ. रवी राणा, आ. प्रवीण तायडे, आ. प्रताप अडसड, आ. उमेश यावलकर, आ. राजेश वानखडे, अपर जिल्हाधिकारी गोविंदा दाणेज, माजी आमदार प्रवीण पोटे पाटील, जेडीए प्रमोद लहाळे, आरडीसी अनिल भटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, कृषी विकास अधिकारी मल्लपा तोडकर आदी उपस्थित होते. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कृषी विभागाची तयारी व कृषी निविष्ठांची उपलब्धता याची माहिती एसएओ सातपुते यांनी दिली. यानंतर पालकमंत्र्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. यामध्ये कागदोपत्री वर्क नको, शेतकऱ्यांची उत्पादकता वाढ होण्यासाठीचे प्रयत्न, याबाबत शेतकऱ्यांच्या बैठकी, त्यांना केलेले मार्गदर्शन, याबाबतची माहिती त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडे मागितली. यामध्ये काहींचे काम कमी पडत असल्याने निदर्शनात येताच पालकमंत्र्यांनी महिनाभर करावयाच्या कामांचे नियोजन दिले.
उत्पादकतावाढीसाठी काय केले, ते पहिले सांगा बियाणे प्रक्रियेसाठी प्रात्यक्षिक दिल्याचे एका कृषी अधिकाऱ्याने सांगताच पालकमंत्री संतापले, तुम्ही काही उपकार करीत नाही. यापेक्षा वेगळे काय केले. शेतकऱ्यांच्या उत्पादकतावाढीसाठी तुम्ही किती शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले, तुमच्या मार्गदर्शनामुळे किती शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ झाली. याची माहिती शेतकऱ्यांच्या नावासहीत सांगा, असे ना. बावनकुळे यांनी सुनावले. पेपरवर्क नको असे ते म्हणाले.
संवाद बैठकीद्वारे आता महिनाभर गावनिहाय सभा महिनाभर गावनिहाय बैठकी घ्या, यामध्ये शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन करा, बैठकीला गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी यांनाही या बैठकीत बोलवा. शेतकऱ्यांची मते जाणून घ्या. नावीण्यपूर्ण कामांचा आराखडा तयार करा. शेतकरी काय म्हणतात, याचा ‘फीड बॅक’ घ्या. २९ जुलैपूर्वी ही कामे करा. यानंतर काय पाठबळ द्यायचे, ते ठरविता येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





