एक वर्षापासून नाली, रस्त्याचे बांधकाम नाही, जलजन्य आजारांचा विळखा, नागरिक त्रस्त
दर्यापूर : शहरातील सैनिक कॉलनी, रुक्मिणीनगर, विठ्ठलवाडी, होले कॉलनी, साईनगर परिसरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून अस्वच्छता व अर्धवट विकासकामांच्या समस्येला सामोरे जात आहेत. नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या घरात साचलेल्या सांडपाण्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
दर्यापूर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी ५० फुटी रस्त्याचे व दोन्ही बाजूंनी नाली बांधकामाचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात हे आदेश आजतागायत अंमलात आलेले नाहीत. मागील १२ महिन्यांपासून रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. परिणामी, पावसात रस्त्यावर व परिसरात पाणी साचून नागरिकांच्या घरात शिरत आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी समस्या मांडण्यासाठी २७ ऑगस्ट २०२४, ७ ऑक्टोबर २०२४ व १० मार्च २०२५ रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदने दिली. त्यानंतर २८ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अनिल बोंडे, आ. गजानन लवटे, माजी खासदार नवनीत राणा यांनाही निवेदने देऊन समस्या मांडली. तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही.
अधिकाऱ्यांवर व्हावी कारवाई सैनिक कॉलनी रस्ता हा महत्त्वाचा जोड रस्ता असल्याने वाहतुकीसही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील नाली आणि रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावीत, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत.
नगरपरिषद समोर दिला होता ठिय्या पाण्याच्या निचऱ्याच्या समस्येवर रहिवासी प्रशांत चौधरी, संजय नागपुरे, अवधूत गायकवाड, प्रा. अनिरुद्ध होले, नितीन वानखडे, अनिल गावंडे, बाळकृष्ण राखोंडे, धनंजय उंबरकर, दिनेश नवलकर, धर्मराज ठाकरे, ललिता इंगळे, संजय चव्हाण, ठिय्या दिला होता.
सैनिक कॉलनीचा मुख्य रस्ता हा ३० मीटरचा असून एका बाजूला अतिक्रमण काढून नाली झाली आहे. दुसऱ्या बाजूचे अतिक्रमण काढल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
– डॉ. विकास खंडारे, मुख्याधिकारी, न. प. दर्यापूर.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





