
धामणगाव रेल्वे ग्रामदेवता, शिवशंकर, खंडोबा, भैरव, जोतिबा यांच्याजवळ ग्रामस्थांचे दुःख मांडणारा गुरव समाज सुविधा व आरक्षणापासून वंचित आहे. लोकसंख्येच्या तुलनेने राजकीय आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी गुरव समाज मागील अनेक वर्षांपासून करीत आहे.
गुरव म्हणजे शिवाचा पुजारी. भगवान महादेव हे गुरव समाजाचे आराध्य दैवत. भैरव, खंडोबा, जोतिबा, खळनाथ हे शंकराचे अवतार मानले गेल्याने या देवतांची पूजा अनेक शतकांपासून गुरव कुटुंब करीत आहे. जुन्या ग्रामव्यवस्थेत शेती हा मध्यवर्ती व्यवसाय असताना गावकऱ्यांच्या गरजा भागविण्यासाठी विविध जातीनुसार व्यवसाय उभे राहिले. त्यांना कामाच्या मोबदल्यात शेतीचे उत्पन्न मिळत असे. याला बलुतं म्हणत. गावाच्या बारा बलुतेदारांपैकी गुरव ही एक जात गावातील देवाच्या दैनंदिन पूजेबरोबर मंदिराचे पावित्र्य राखणे, तेल-वात करणे, द्रोण पत्रावळ्या पुरविणे, मंगल कार्यात शिंग वाजविणे, सनई वाजविणे तसेच मृदंग, पखवाज, तबला वाजविणे अशा कलेतही पारंगत होती. त्या बदल्यात त्यांना देवापुढील येणारे उत्पन्न तसेच मानधन मिळायचे त्यावरच त्यांची गुजराण चालायची. प्राचीन राजेरजवाडे, इंग्रजांच्या राजवटीत मंदिराच्या देखभालीसाठी,निर्वाहासाठी काही इनाम जमिनी दिलेल्या आहेत. परंतु, ट्रस्ट कायद्याने त्या इनाम जमिनीवरील हक्क निघून गेला. सेवा मात्र बंधनकारक राहिल्या. काही जमिनी सामाजिक विकासासाठी सरकारने विनामोबदला ताब्यात घेतल्या, तर काही जमिनींवर गावातील वजनदार व्यक्तींनी कब्जा केला. दुसरे उपजीविकेचे साधन नसल्याने गरीब गुरव पुजारी आहे तेथेच आजही आहेत. गुरव जातीत अनेक पोट जाती, गट आहेत. प्रदेशानुसार झाडे, वन्होडे, खानदेशी, अहीर, नगरे, जुन्नरे, कोकणी अशी विभागणी झाली, तर उपासनेनुसार हिंदू, जैन, लिंगायत अशी विभागणी झाली. या गुरव समाजास संतपरंपरादेखील आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







