
धारणी,: दहा वर्षे झाली, पणगडगा मध्यम प्रकल्पाच्या नावाने तयार झालेला मोठा तलाव पूर्ण झालेला नाही. फक्त ठेकेदाराच्या भल्यासाठी झालेल्या या तलावामुळे शेतकऱ्यांना कोणताच लाभ आतापर्यंत मिळू शकला नाही; मात्र, यावर्षी प्रथमच बारा महिने वाहणारी ही नदी कोरडी पडल्याने तलावाचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.बारमाही जिवंत नदी म्हणून गडगा नदीचा उल्लेख आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. गडगा नदीच्या काठी वसलेल्या गावांचे आदिवासी उन्हाळ्यात या नदीच्या पाण्याने पालेभाज्यांचे पीक घेत असतात. मात्र, या वर्षी एप्रिलपासूनच गडगा नदी कोरडी पडून पात्रात फक्त दगडच दगड दिसत आहेत. ढाकणा, अढाव, सावर्या, गडगा भांडूम, बिजूधावडी, मान्सूधावडी, नंदगाव, टेमली, रोहणीखेडा, माांडू, घुटी, कळमखार, धुळघाट, गोंडवाडी यासह अनेक गावांचे शेतकरी उन्हाळ्यात या नदीच्या भरवशावर शेती करायचे, मात्र या वर्षी गडगा कोरडी पडल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच विजेचा कमी दाबाचा पुरवठा असल्याने अनेक पाणी पुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत. अशातच गडगा कोरडी पडल्याने जनावरांसाठी आणि कपडे, भांडे धुण्यासाठी आदिवासींना वणवण भटकावे लागत आहे. गडगा प्रकल्पाचा लाभ होणे तर दूरच, मात्र दुष्परिणाम स्पष्ट जाणवायला लागले आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






