
अमरावती : उन्हाचा पारा वाढू लागलाय तसा हळूहळू आता उष्णतेचा त्रास होणे सुरू झाले आहे. मे महिन्याच्या उकाड्याने अनेकजण हैराण झाले आहेत. ऊन लागून ताप येणं, अशक्तपणा, जेवण न जाणं हे त्रास अनेकांना उन्हामुळे सुरू होतात. यासोबतच सुरू होणारा एक महत्त्वाचा त्रास म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन होणारे डिहायड्रेशन. वेळीच उपचार केले नाहीत, तर डिहायड्रेशनचा त्रासही वाढतो आणि धोकादायक ठरू शकतो.
डिहायड्रेशन म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. साध्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर उन्हाळ्यात घाम येण्याचं प्रमाण खूप वाढतं. काही कारणांमुळे पाणीही कमी प्यायलं जातं. त्यामुळे मग हळूहळू शरीरातील पाण्याची पातळी कमी होत जाते. पाण्याची पातळी कमी झाली की आपोआपच शरीरातील खनिजे, सोडियम, साखर, अत्यावश्यक जीवनसत्त्वे संपूर्ण शरीरात पोहोचत नाहीत आणि त्यांची कमतरता निर्माण होते. तसेच पाणी कमी झाल्याने शरीरातील विषारी द्रव्येही शरीराबाहेर फेकली जात नाहीत. याचा एकत्रित परिणाम होतो व वेगवेगळ्या स्वरूपात डिहायडेशनचा त्रास जाणव लागतो
उन्हामुळे डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. तसेच पाणी भरपूर प्रमाणात प्यावे. फळे तसेच ज्यूस, सरबत घ्यावे. जर डिहायड्रेशनची लक्षणे दिसून येत असतील तर तातडीने रुग्णालयात जाऊन उपचार घेणे गरजेचे आहे.
– डॉ. नरेंद्र सोळंके, आरएमओ, इर्विन
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






