
अमरावती : काही वर्षांपूर्वी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चांदुर रेल्वे येथील रितेश अशोक मेश्राम (३४) यांच्यावर चांदुर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना तारखेवर हजर न राहील्याने १० जून रोजी रात्री साडे अकरा वाजता पोलिसांनी रितेश मेश्राम याला अटक केली.त्यांनतर त्याला चांदुर रेल्वे पोलिसांनी बेदम मारहाण केली व जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान रितेश मेश्राम यांचा मृत्यू झाल्याने आझाद समाज पार्टीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
दोषी पोलीस व रुग्णालयातील डॉक्टरांवर कार्यवाही करा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रितेश अशोक मेश्राम या युवकावर चार वर्षांपूर्वी भादंवि ३५३ कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर रितेश मेश्राम नोकरीनिमित्ताने बाहेरगावी गेला होता व काही कामानिमित्य चांदुर रेल्वे येथे आला होता. दरम्यान न्यायालयीन तारखेवर हजर न राहल्याने चांदुर रेल्वे पोलिसांनी अटकेचा वॉरंट काढून १० जून रोजी रात्री साडे अकरा वाजता रितेशला त्याच्या राहत्या घरून पोलिसांनी अटक केली. त्यानंतर रात्री त्याला पोलीस कोठडीत डांबून जबर मारहाण केली. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता त्याला वडाळी अमरावती येथील कारागृहात हजर करण्यात आले मात्र शरीरावर जखमा असल्याने कारागृह निरिक्षक यांनी पोलिसांना जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
आझाद समाज पार्टीची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
रितेश मेश्राम याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले तर दुसरीकडे रितेशच्या कुटुंबीयांनी रितेशचा जामीन मंजूर झाल्याचे पत्र चांदुर रेल्वे पोलिसांना दिले तर पोलिसांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. रितेशची आई जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस कस्टडी वॉर्ड क्र.१४ मध्ये गेली असता तेथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्याने भेटू दिले नाही.१३ जून रोजी पुन्हा कुटुंबातील सदस्य रितेश ला भेटायला गेले. तेव्हा उपस्थित पोलीस कर्मचारी व रुग्णालयातील कर्मचारी यांनी तुमचा मुलगा मरण पावलेलाआहे त्याचे प्रेत घेऊन जा असे सांगितले तेव्हा कुटुंबियांना धक्काच बसला.
सदर घटनेची माहिती आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र मुख्य महासचिव मनीष साठे यांना मिळताच यांच्या मार्गदर्शनात अमरावती शहराध्यक्ष विपुल चांदे यांच्या नेतृत्वात त्यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट दिली. मृतकाच्या शरीरावर मारण्याचे व्रण स्पष्ट दिसत होते त्यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून तसेच मृतकाच्या इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. मृतकाच्या शरीरावर असलेल्या जखमा मृतकाला बेदम मारहाण केल्याचा पुरावा असून दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर त्वरित कार्यवाही करावी अन्यथा आझाद समाज पार्टी याविरोधात आंदोलन करेल असा इशारा शहराध्यक्ष विपुल चांदे,जिल्हाध्यक्ष सनी चव्हाण,संजय गडलिंग,दीपक खंडारे,सुरज रामटेके, धर्मपाल मेश्राम यांनी दिला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






