
अडगांव बु. : यावर्षी सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या परीस्थितीत आजची पिकांची अवस्था पाहता तेल्हारा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने तेल्हारा तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
तेल्हारा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न झाल्यास तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्च्या वतीने यापूर्वी देण्यात आला होता. त्यानुसार शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख लक्ष्मीकांत कौठकार यांचे नेतृत्वात तालुका अध्यक्ष निलेश नेमाडे, गावप्रमुख अमोल मसुरकार, राहतखॉ, रितेश देशमुख, रमेश मानकर, महेश उमाळे, पिंटू खिरोडकार, अन्सारखॉ, अनिल मानकर, नितीन ढोकणे, हरिश्चंद्र देवळे व तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात दिवसभर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.
यामध्ये सततच्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीचा शासनाने सर्व्हे करावा व तेल्हारा तालका दष्काळग्रस्त घोषित करून शासनाने शेतकऱ्यांना भरीव अशी मदत द्यावी अशी मागणी रेटून धरली. तसेच गावपातळीवर पर्जन्य मापन यंत्र बसविण्यात यावे, शासनाची मदत मिळताना वारंवार येणाऱ्या अडचणी पाहता मदत ही तालुका स्तरावरुन वितरीत करण्यात यावी अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी यावेळी केल्या. तहसीलदार समाधान सोनवणे यांनी भेट देऊन निवेदन स्विकारले व मी तुमच्या मागणी बद्दल जिल्हाधिकारी यांचेशी बोलतो असे आश्वासन दिले. येत्या २० सप्टेंबर पर्यंत तेल्हारा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कौठकार यांनी दिला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







