
अंजनगाव सुर्जी: तालुक्यामध्ये भेसळयुक्त पनीर, दूध, दही मोठ्या प्रमाणात विकले जात आहे, अशी तक्रार बोराळा येथील रहिवासी राजकुमार तायडे यांनी बुधवारी तहसीलदारांकडे केली. सणासुदीच्या वाढलेल्या मागणीचा फायदा घेऊन दूध व पनीरमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात असून, नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला आपले कर्तव्य, अधिकारांचा विसर पडला असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, कालबाह्य झालेले पनीर, दूध, दही मोठ्या प्रमाणात शहरातील दूध डेअरीमध्ये मिळत आहे. गल्लीबोळात या व्यवसायाचे पेव फुटले आहे. कधी कडू-आंबट पनीर मिळते. दूध संध्याकाळपर्यंत फाटते. पनीरची चव भाजी केल्यानंतर स्वादिष्ट लागत नाही, असेही लक्षात आले आहे. अशा पनीरचा दर ३०० ते ४०० रुपये किलो आहे. सणाच्या दिवशी मलई काढून घेतलेले दूध ऐंशी रुपये लिटर विकले जाते. डेअरी संचालक क्रूर नफेखोरी करीत आहेत. अंजनगावात प्रत्येक दूध डेअरीची आठवड्यातून एकदा तपासणी व्हावी व भेसळयुक्त पदार्थ विक्रेत्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारकर्त्याने केली. यावेळी राजेश चोरपगार, अमोल काटोके, वैभव लोणकर, अजय अभ्यंकर उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







