
अमरावती : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार चिठ्ठा प्रभावी माध्यम ठरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) मार्फत संपूर्ण वोटर स्लिप देण्यात येणार आहे. याबाबत सूचना देण्यात आल्या असून येत्या दोन दिवसांत मतदार चिठ्ठीचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. यात कसूर करणाऱ्या बीएलओंविरुद्ध कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मंगळवारी दिले.आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे व इतर उपस्थित होते. मतदारांना मतदानाआधी मतदान चिठ्ठी मिळाल्यास त्यांना आपले मतदान कोणत्या केंद्रावर आहे. याची माहिती मिळण्यास मदत होते. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी गेल्यास त्यांना मतदानासाठी आवाहनही करणे शक्य आहे. प्रामुख्याने शहरी भागात मतदानाची टक्केवारी कमी असते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ज्या भागात कमी मतदान झाले, त्याच भागात जनजागृतीचे उपक्रम राबवावे, या भागावर लक्ष केंद्रीत केल्यास मतदानाची टक्केवारी वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. निवडणुकीसाठी दोन आठवड्यांचा कालावधी आहे. या काळात बहुसंख्य मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य आहे. त्यामुळे मनपा क्षेत्रात मतदार जनजागृतीकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांसाठी मतदान केंद्रांवर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रामुख्याने पाणी आणि परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







