
अमरावती : विधानसभा निवडणुकीत व्यस्त शेतकरी, शेतमजूर मोकळे होताच रब्बीच्या पेरण्या वाढण्याची शक्यता होती. प्रत्यक्षात ढगाळ वातावरणाने थंडी गायब झाल्याने गव्हाच्या पेरण्या रखडल्या होत्या. आता पुन्हा थंडी परतल्याने उबदार वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे गव्हाच्या रखडलेल्या पेरण्या मार्गी लागणार व क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे.
गव्हाच्या लागवडीसाठी वातावरणात थंडावा आवश्यक आहे. त्यामुळेच जिल्ह्यात गव्हाच्या पेरण्या नोव्हेंबर अखेरपासून जानेवारीपर्यंत राहतात. गव्हाच्या पेरणीसाठी तापमान १० ते १५ अंशाच्या दरम्यान व वातावरण कोरडेपणा आवश्यक आहे. शिवाय गव्हाच्या वाढीसाठी १८ ते २२ अंशांपर्यंतचे तापमान उत्तम मानण्यात येते. थंडीसोबत दव असल्यास गव्हाच्या पिकाला बाधा येऊ शकते. शिवाय हरभऱ्याला उबदार वातावरण आवश्यक आहे. अशा वातावरणात हरभऱ्याची वाढ चांगली होते व बहरदेखील चांगला येतो. यादरम्यान अवकाळी झाल्यास पिकाचे नुकसान होते. अलीकडे दरवर्षीच अवकाळी पाऊस होत असल्याने गहू व हरभऱ्याच्या सरासरी उत्पादनामध्ये कमी येत असल्याचे दिसून येते.
गव्हाची पेरणी झालेले तालुकानिहाय क्षेत्र सद्यस्थितीत धारणी तालुक्यात ६,०४९ हेक्टर, चिखलदरा ९६४, अमरावती १,९३२, भातकुली २७, नांदगाव खंडेश्वर २,८७८, चांदूर रेल्वे ३,२८७, तिवसा १,७६०, मोर्शी १,८९९, वरुड १,९५३, दर्यापूर ३०, अंजनगाव सुर्जी, २२४, अचलपूर १,१६१, चांदूरबाजार ७०६ व धामणगाव तालुक्यात ६,६३२ हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी करण्यात येणार आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







