
अमरावती : विधानसभा निवडणुकीत सोयाबीन दराचा मुद्दा गाजत असताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी १२ टक्के आर्द्रतेचा नियम शिथिल करून १५ टक्क्यांपर्यंत केला व तसे पत्रदेखील १५ नोव्हेंबरला राज्याच्या मुख्य सचिवांना दिले. यावर राज्य शासनाने मात्र नाफेडला तशा सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे शासन खरेदी केंद्रांवर १२ टक्के निकषानेच सोयाबीनची खरेदी होत आहे.
अशा परिस्थितीत सोयाबीनच्या शासन खरेदीत १५ टक्के आर्द्रतेचा निकष हा ‘चुनावी जुमला’ ठरला व शासनाने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप होत आहे. विधानसभा निवडणुकीत १५ नोव्हेंबरला धामणगाव मतदारसंघात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी प्रचारसभेत सोयाबीनच्या दरवाढीची वाच्यता करून शासन खरेदी केंद्रात १२ ऐवजी १५ टक्के आर्द्रतेचा निकष जाहीर केला व त्याच दिवशी केंद्रीय कृषी मंत्रालयाचे उपायुक्त बिनोद गिरी यांचे स्वाक्षरीचे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविण्यात आले व निवडणुकीच्या माहोलमध्ये हे पत्र व्हायरलही झाले. जिल्ह्यात १९ केंद्रांमध्ये सोयाबीनची शासन खरेदी होत आहे. या सर्व केंद्रांमध्ये आजही १२ टक्के आर्द्रतेच्या निकषानेच सोयाबीनची खरेदी केली जात आहे. आर्द्रतेच्या निकष बदलाबाबत नाफेडच्या वरिष्ठ कार्यालयाचे पत्र अद्याप प्राप्त नाही. त्यामुळे जुन्याच १२ टक्क्यांच्या निकषाने सोयाबीनची खरेदी होत असल्याचे यंत्रणांनी सांगितले.
खरेदीपश्चात ‘वखार’च्या गोदामातूनही रिजेक्ट जिल्ह्यातील १९ शासन खरेदी केंद्रात सोयाबीनची खरेदी झाल्यानंतर ते महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठवणुकीसाठी पाठविले जाते. तेथे सव्र्व्हेअरद्वारा आर्दता व एफएक्यू ग्रेड या सबबीखाली परत पाठविल्याचे प्रकार घडत आहे. यामध्ये संबंधित सबएजंट संस्थांना नाहकचा भुर्दंड बसत असल्याचे वास्तव आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






