
मोर्शी : पावसाळ्यामध्ये अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदीत पाणी सोडल्यानंतर पाण्याखाली जाणारा पहिला पूल अशी ओळख मोर्शी-आष्टी रस्त्यावरील सिंभोरानजीकच्या पुलाची आहे. गेल्या काही वर्षांपासून हा पूल प्रत्येक पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने पर्यटकांमध्ये त्याची भीती पसरली आहे. तथापि, या पुलावर नागरिकांच्या तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बसवलेले संरक्षक कठडे गेल्या काही महिन्यांपासून गायब झाले आहेत. त्यामुळे या पुलावरून ये- जा करणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या मोर्शी-आष्टी रस्त्यावरील पुलाचा वापर वाहतुकीसाठी केला जातो. अप्पर वर्धा धरण पाहण्यासाठी येणाऱ्या लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून देखील या पुलाचा वापर केला जातो. नागरिकांना सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी या पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे बसविण्यात आले होते. पण, सध्या हे कठडेच नसल्याने नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होण्याआधी खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन या पुलाला बसविण्यात आलेले लोखंडी संरक्षक कठडे काढून ठेवते. पण, आता डिसेंबर महिना सुरू झाल्यानंतरही हे संरक्षक कठडे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कोणत्याही वेळेस अनुचित प्रकार घडून जीवितहानी होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






