शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख १२६ वा जयंतीउत्सव
अमरावती : पर्यायी पिक म्हणून विदर्भातील शेतकऱ्यांनी केळी पिकाचा विचार करावा यासाठी केळीच्या विविध जातींची माहिती देण्यासोबतच मशागत ते निर्यातीपर्यंतची संपूर्ण साखळी मांडणारी ‘डॉ.पंजाबराव देशमुख राज्यस्तरीय केळी परिषद’ आज श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रातील केळी बागांच्या परिसरात पार पडली.शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२६ व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि जैन इरिगेशन सिस्टीमच्या संयुक्त वतीने आयोजित या परिषदेचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेतला.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित या केळी परिषदेचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे हस्ते झाले.विधान परिषद सदस्य आमदार किरण सरनाईक, शेतकरी नेते व दै.देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, प्रगतीशील केळी उत्पादक माजी खासदार अशोक मोहोळ उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र,त्रिची चे संचालक डॉ.आर.सेल्वराजन, आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ व जैन इरिगेशन सिस्टीमचे उपाध्यक्ष डॉ.के.बी.पाटील, विठ्ठल गंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, निमगाव, सोलापूरचे संचालक डॉ. युवराज शिंदे, कृषी व जलतज्ञ डॉ. सुधीर भोंगळे, प्रशांत भोयर यांनी प्रमुख वक्ते म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या परिषदेत केळीचे भरघोस उत्पादन घेणारे विदर्भातील पाच शेतकऱ्यांना ‘डॉ.पंजाबराव देशमुख केळीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या शेतकऱ्यांमध्ये भगवंत महासिंग इंगळे, वरणा जिल्हा बुलढाणा, उमेश तुळशीराम भोंडे, अंजनगाव सुर्जी, विकास विजयराव देशमुख, पणज तालुका आकोट, कुंदन देवरावजी वाघमारे, पवनार आणि श्रीकांत छत्रपती धोंडे, इनायतपूर तालुका चांदूर बाजार यांचा समावेश होता. परिषदेला उपस्थित सर्व पाहुण्यांचा अध्यक्ष आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.गजाननराव पुंडकर, अॅड. जे. व्ही. पाटील पूसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य प्रा.सुभाष बनसोड, सचिव डॉ.वि.गो.ठाकरे, आयोजन समिती सचिव प्राचार्य डॉ.समीर लांडे, सदस्य प्राचार्य डॉ.सी.एम.देशमुख, डॉ.नंदकिशोर चिखले, डॉ.ए.एच.ढोबळे, डॉ.आर.एस.खाडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

या परिषदेचे आयोजन श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.केळी परिषद आयोजन समितीचे अध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांनी आपल्या प्रास्ताविकातून आयोजनामागची भूमिका विषद केली. अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उद्घाटक कुलगुरू डॉ.शरद गडाख, आमदार किरण सरनाईक, संपादक प्रकाश पोहरे, माजी खासदार अशोक मोहोळ, डॉ. आर. सेल्वराजन यांनी उद्घाटन सोहळ्यात आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.राजेश मिरगे यांनी केले तर आयोजन समितीचे सचिव प्राचार्य डॉ. समीर लांडे यांनी आभार मानले.
कुलगुरू डॉ.शरद गडाख
विदर्भातील परिस्थिती आणि पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी असून या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी चार सूत्रीचा नवा प्रयोग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरु केला आहे.विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील एक गाव विद्यापीठाने दत्तक घेतले असून तेथेही चार सूत्री राबविण्यात येत आहे.उत्पादकता वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे, शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे विपणन करणे आणि शेतीला दुग्ध व्यवसाय व इतर पूरक व्यवसायाची जोड देणे ही ती चार सूत्रे असून त्यामुळे अकरा गावांचे २२ टक्के उत्पन्न वाढले. महाराष्ट्राला हे रोल मॉडेल द्यावयाचे आहे. या परिषदेच्या आयोजनासाठी त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले.
अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख
शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची असून जो पर्यंत शेतकरी अन्न धान्य पिकविणे बंद करून त्याच्या फायद्याची पिके घेणार नाही तो पर्यंत हे शक्य नाही. भाऊसाहेबांना आदरांजली म्हणून दरवर्षी संस्थेतर्फे कृषी संबंधी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून पुढच्या वर्षी आंबा परिषद व प्रदर्शनी भरविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या प्रक्षेत्राला भेट देऊन प्रोत्साहन घ्यावे.
प्रकाश पोहरे
प्रमुख पाहुणे प्रकाश पोहरे यांनी शेतकऱ्यांच्या कालच्या व आजच्या स्थितीवर भाष्य केले.जेंव्हा शहरात राहणारे लोक उपाशी राहतात तेंव्हाच त्यांना शेतकऱ्यांची किमत कळते. शेती उत्पादनाला योग्य भाव मिळण्यासाठी मधले दलाल व विपणनाची व्यवस्था बदलणे आवश्यक असून ज्या दिवशी या कृषिप्रधान देशाचा शेतकरी देशाचा पंतप्रधान होईल, तेंव्हाच शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल, असे ते म्हणाले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






