
अमरावती: पौष महिन्याच्या पहिल्याच रविवारी बहिरम यात्रा यात्रेकरूंच्या गर्दीने गजबजली. जवळपास ७५ हजार लोकांनी बहिरमबाबांचे दर्शन घेतले.
पहिल्यांदाच या गर्दीत लहान मुले आपल्या आई-वडिलांपासून दुरावली. गर्दीमुळे पती-पत्नी ही – एकमेकांपासून दूर गेले. गर्दीत शोधाशोध करताना त्यांची चांगलीच दमछाक झाली. काहींनी मंदिर व्यवस्थापनाकडे हरवलेल्यांची, दुरावलेल्यांची नावानिशी माहिती दिली. ती माहिती व्यवस्थापनाने माईकवरून सार्वजनिक केली. यात ते दुरावलेले अखेर परत एकमेकांना भेटले.
मंदिरावरील पार्किंग सकाळी ११ वाजताच बंद केली गेली. यात्रेतील पार्किंग व्यवस्थाही हाउसफुल्ल राहिली. त्यामुळे यात्रेबाहेर, पार्किंगबाहेर रोडच्या कडेला लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळपर्यंतही यात्रेतील गर्दी कमी नव्हती. परतवाडा-बैतूल या राष्ट्रीय महामार्गावरून बहिरमकडे जाणारी जड वाहनांची वाहतूक खरपीपासूनच करजगाव मार्गे वळविली गेली. बहिरमच्या यात्रेतील ही गर्दी उल्लेखनीय ठरली. पोलिस बंदोबस्तही चोख राहिला.
जेवणावळी यात्रा आणि पौष महिन्यातील रविवारनिमित्त यात्रेत जेवण देणाऱ्यांची संख्या अधिक राहिली. रोडग्याच्या भाजणीचा आणि आलू- वांग्याच्या भाजीचा सुगंध या गर्दीतही यात्रेत सर्वत्र दरवळत होता.
पन्नालालचे गाढव
• बहिरम यात्रेत पन्नालालचे गाढव दाखल झाले आहे. या गाढवाने गर्दीतील यात्रेकरूंची पोलखोल करून चांगलीच फजिती केली. दिवसभर हे गाडव यात्रेचे आकर्षण ठरले.
दर्शनार्थीच्या रांगा
• बहिरमबाबांचे दर्शन घेण्याकरिता मंदिरावर सकाळपासूनच दर्शनार्थीच्या रांगा लागल्या होत्या. दर्शनार्थीकडून सतत केल्या जात असलेल्या बहिरमबाबाच्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर न्हाऊन निघाला होता.
नवसाचे बोकड आणि पाळणे
• बहिरमबाबा श्रद्धेला पावतो, मनोकामना पूर्ण करतो, अशी भक्त्तांमध्ये ख्याती आहे. सबब, यात्रेदरम्यान नवस फेडण्याची परंपरा आहे. या अनुषंगानेच मनोकामना पूर्ण झालेल्यांनी रविवारी बहिरमबाबांना चांदीचे पाळणे अर्पण केले. एका भक्ताने श्रद्धेपोटी एक जिवंत बोकड मंदिर परिसरातील प्रांगणात सोडले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






