
४५ विहिरींचे अधिग्रहण दररोज ११ टँकरने पाणी वाटप
अमरावती : प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहचवण्यासाठी प्रस्थावित नव्या जलवितरण योजना काही केल्या पूर्ण होण्याचे नावच घेत नसल्याने यावर्षीही जिल्ह्यातील अनेक गावात टँकरनेच पाणी पुरवठा करावा लागत आहे. सध्या रखरखीत उन्हामुळे जिल्ह्यातले जलस्त्रोत आटू लागले असून अनेक गावांना कोरड लागली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षीच्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणून विविध ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर जिल्ह्यातल्या ८ गावात ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा करुन नागरिकांची तहान भागविली जात आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात चांदूरबाजार वगळता १३ ही तालुक्यांत पावसाने सरासरी गाठली नाही. परिणामी जमिनीचे पुनर्भरण न झाल्याने मार्च पश्चात भूजलस्तर झपाट्याने खाली गेला. त्यामुळे अनेक गावांचे जलस्त्रोत आता कोरडे पडत असल्याने पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. त्या तुलनेत करावयाच्या उपाययोजना लोकसभेच्या आचारसंहितेत अडकल्याने अनेक गावे तहानलेली आहे. आयोगाचे निर्देशानुसार केवळ टँकर सुरु करणे व विहिरींचे अधिग्रहण यालाच मुभा असल्याची माहिती प्रशासनाने दिली. सद्यस्थितीत अमरावती तालुक्यात ७, भातकुली १, चांदूर रेल्वे ३, नांदगाव खंडेश्वर १६, अचलपूर ३, मोर्शी ११ तसेच वरुड व चिखलदरा तालुक्यात प्रत्येकी दोन अस्या एकूण ४५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असल्याचेही यावेळी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.
टँकरने पाणी पुरवठा सुरु असलेली गावे
सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यात बेला (सलोना), मोथा, धामकटडोह, आकी, बहाद्दरपूर गौलखेडा बाजार येथे प्रत्येकी १ तर खडीमल येथे चार टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे अद्यापही पूर्ण झालेली नसल्याने तात्पुरती उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






