
मोर्शी : अमरावती जिल्ह्यात सध्या रासायनिक खतांच्या खरेदीवर लिंकिंगचे प्रमाण वाढत आहे. शेतकरीवर्गाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. गरज नसताना इतर खते व औषधे खरेदी करावी लागत आहेत. नैसर्गिक व सुलतानी संकटांमुळे आधीच शेतकरी कर्जबाजारी झाले असून त्यात रासायनिक खताची टंचाई व लिंकिंगची भर पडत आहे. कृषी विभागाने त्वरित चौकशी करून रासायनिक खतावरील इतर खतांची व औषधांची सक्ती थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली.
जिल्ह्यात सध्या बऱ्याच प्रमाणात रासायनिक खतांचा पुरवठा उपलब्ध झाला आहे. तथापि, काही रासायनिक खताच्या कंपन्यांकडून या खतावर मोठ्या प्रमाणात लिंकिंग होत असल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नामांकित खत कंपन्यांकडून २४:२४:०, १८:१८:००, १८:४६:०, १०:२६:२६, डीएपी, युरिया यासह विविध महत्त्वाच्या खतांवर इतर खते दिली जात आहेत. या खतावर ४०० किंवा ५०० रुपयाचे खत घ्यावेच लागेल, असे सांगितले जात आहे. १०० टक्के सेंद्रिय शेती अजून यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे रासायनिक खताशिवाय उत्पादन वाढू शकत नाही, असे अनेक प्रयोगशील शेतकरीवर्गाचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड कशासाठी ?रासायनिक खतांच्या टंचाई व लिंकिंगबाबत बळीराजाला ‘तोंड बांधून बुक्क्यांचा मार’ या म्हणीचा प्रत्यय येत आहे. तक्रार करावी तर दुकानदार आपल्याला खत देणार नाही. त्यामुळे शेतकरी हे सर्व लिंकिंगचे वाढलेले प्रमाण सहन करीत आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






