
चांदूर बाजार : गॅस कनेक्शनधारकांना केवायसी करण्यासाठी वितरकांकडून आवाहन केले जात आहे. मात्र, केवायसीकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. अनेकांची केवायसी रखडल्याने वितरकांना डेटा अपडेट करताना चांगल्याच अडचणी येत आहेत. केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा ग्राहकांना सबसिडीही मिळणार नाही. त्याची मुदत आता ३१ मेनंतर ६ जून अशी वाढविण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, केवायसी करण्यासाठी अनेक गॅस ग्राहकांनी दिलेल्या मुदतीत पाठ फिरविल्याचे चित्र आहे. सर्वच गॅस कनेक्शनधारकांना केवायसी करणे बंधनकारक केले आहे. केवायसी न करणाऱ्या नियमित ग्राहकांना तसेच उज्ज्वला योजनेच्या गॅस कनेक्शनधारकांना ३०० रुपये दिली जाणारी सबसिडी कायमची बंद केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी तातडीने केवायसी करून घ्यावी, असे आवाहन सर्वच गॅस एजन्सीच्या संचालकांकडून करण्यात आले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस कनेक्शनधारकांना केवायसी बंधनकारक केली असून, केवायसी न केल्यास संबंधित ग्राहकाचे गॅस कनेक्शन बंद होणार असून, अनुदानही येणार नाही. त्यामुळे सर्वांना केवायसी करणे गरजेचे झाले आहे. याकरिता ग्राहकांना ६ जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
केवायसी एजन्सीकडेच यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांची काही बंधने नसल्याने गॅस नियमानुसार उपलब्ध होत होता. परंतु, आता केवायसीसाठी कडक निर्बंधामुळे ग्राहकांना गॅस दिला जाणार नाही. एकाच पत्त्यावर आणि एकाच नावावर वेगवेगळे कनेक्शन रद्द होतील.
मुदत वाढली चांदूर बाजारात एकच गॅस एजंसी असून, ३० हजार ग्राहक आहेत. आतापर्यंत केवळ चार ते पाच हजार ग्राहकांची केवायसी प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे आता दि. ६ जून ही केवायसी प्रक्रियेची नवी मुदत दिली आहे.
केवायसीकरिता कंपनीकडून दि. ६ जूनपर्यंत मुदत देण्यात आली. शहरात अद्याप केवळ २० टक्केच ग्राहकांची केवायसी झाली आहे.
कल्पना विलास तायवाडे, व्यवस्थापक, गॅस एजंसी, चांदूर बाजार
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






