अमरावती : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बेलोरा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या वतीने हे विमानतळ सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या असून, जुलैअखेर किंवा ऑगस्ट महिन्यात या विमानतळावरून उड्डाण सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेता महिनाभरापासून वरिष्ठ अधिकारीदेखील प्रयत्न करत आहेत.
माजी मंत्री सुनील देशमुख यांनी बेलोरा विमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता; परंतु गेल्या काही वर्षांत येथील कामाचा वेग मंदावला होता. विमानतळावरील धावपट्टीचे काम पूर्ण झाले, तर टर्मिनल इमारतीसह अन्य कामे सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या व्यवस्थापन संचालक स्वाती पांडे यांनी विमानतळाला भेट दिली होती. त्यांनी येथील कामाचा आढावा घेतला, तर त्यापूर्वी ७ मे रोजी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनीही बैठक घेऊन काम वेळेत पूर्ण करावे, असे सांगितले होते, एटीआर-७२ किंवा इतर विमान अमरावती विमानतळावरून टेक ऑफ करू शकतात. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. येथे पोलिस चौकीही बांधण्यात येणार आहे.
दरम्यान, सोमवारी स्वाती पांडे, इंदू कन्स्ट्रक्शनचे सीईओ ऋषिकेश गभणे, संचालक नितीन गभणे, सी.एस. गुप्ता, मिस्बा अनवर, गौरव उपश्याम आदींनी विमानतळाच्या विकासकामांची पाहणी केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






