
तिवसा पूर्वीच्या निर्मल भारत अभियानामध्ये बदल करून ऑक्टोबर २०१४पासून स्वच्छ भारत मिशन सुरू करण्यात आले. त्यामध्ये ‘नमामि गंगे’चा उदो उदो करून भारतातील प्रमुख नद्यांमधील प्रदूषण थांबविण्यासाठी तसेच नद्यांच्या संरक्षणासाठी २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. ग्रामीण भागातील नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन मृदा व जलसंधारण विभागाकडे सोपविण्यात आले. परंतु, या विभागाने ग्रामीण भागातील नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करणे तर दूरच, साफसफाईचे सौजन्यही दाखविले नाही. त्यामुळे तालुक्यातून वाहणान्या सूर्यगंगा व पिंगळाई या नद्यांमध्ये जलपर्णीवनस्पती व केरकचऱ्याचा ढीग साचला असून, सद्यस्थितीत या नद्यांचा श्वास गुदमरतो आहे. तालुक्यातील तिवसा, मोझरी, शेंदोळा बु,, शेंदूरजना बाजार तसेच वरखेड येथून वाहत असलेल्या नद्यांची बिकट अतिशय अवस्था आहे. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नमामि गंगे मोहीम’ हाती घेतली होती. त्यानुसार प्रत्येक नदीचे पावित्र्य जपण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी जागोजागी नद्यांचे पूजन व आरती ओवाळणीच्या कार्यक्रमाची स्पर्धा लागली होती. परंतु निव्वळ आरती व पूजनाने नदी स्वच्छ होत नाही, याचाच विसर पडल्याने नदीपात्रातील घाण ‘जैसे थे’ राहिली. सध्या नदीपात्रात जलचर वनस्पतींनी थैमान घातल्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबला आहे. या ठिकाणी सरपटणारे प्राणी बाहेर पडण्याचा धोका असल्याने नदीकाठी वास्तव करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक, उन्हाळ्यातच या सर्व नद्यांची साफसफाई, खोलीकरण, रुंदीकरण करणे अगत्याचे होते. परंतु, पावसाळा सुरू होऊनही संबंधित विभागाने याकडे लक्ष दिले नसल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्याने नदीकाठी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची वाताहत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






