
रिद्धपूर : श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे काशी नदीवर जल संधारण विभागांतर्गत बंधाऱ्याचे अंदाजे सव्वाकोटी रुपयांचे बांधकाम एक महिनाभरापूर्वी सुरू करण्यात आले. ज्याठिकाणी या बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे, त्याच ठिकाणाहून शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता काशी नदीतून रस्ता आहे. पावसाळ्यात नदीला पूर असताना शेतात पेरणीकरिता अडचणीचा सामना करावा लागतो. बंधाऱ्याचे बांधकाम कासवगतीने होत असल्याने शेकडो हेक्टर जमीन पडीक राहण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.काशी नदीमधून शेतात जाणाऱ्या रस्त्यावर बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात यावे, जेणेकरून शेतकऱ्यांना बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यानंतर याच बंधाऱ्यावरून रस्ता मिळेल, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केल्यामुळे याच ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम एक महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले. बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे.अपेक्षित असताना आतापर्यंत फक्त या बंधाऱ्याचे अर्धेच काम झाले. ११ जून रोजी मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्यामुळे शेतकऱ्यांना संबंधित ठेकेदाराने शेतकऱ्यांसाठी केलेला तात्पुरता रस्तादेखील वाहून गेला. बंमंगळवारी झालेल्या पेरणीजोग्या पावसामुळे काही शेतकरी शेतामध्ये पेरणी करण्याकरिता सज्ज होऊन निघाले होते. मात्र, नदीतून रस्ताच नसल्यामुळे शेतकऱ्यांना परतावे लागले. वेळेत रस्ता न दिल्यास शेकडो हेक्टर शेती कसण्यासाठी अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागू शकतो.
त्यामुळे कंत्राटदाराने तात्पुरता रस्ता करून द्यावा, अशी मागणी शेतकरी सागर ठाकरे, रमेश पाटील, राजू सिनकर, प्रणीत सिनकर, प्रतीक सिनकर, इर्शाद अहमद, रेखा पाटील यांनी केली. दरम्यान, या मुद्यावर लवकरच तोडगा काढू, असे जलसंधारण अधिकारी संजय मुंदाने यांनी सांगितले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






