अमरावती : शालेय पोषण आहारात आणखीन १५ नवीन पौष्टिक व रुचकर पदार्थांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार अधिक चवदार होणार आहे; पण यासाठीची आर्थिक तरतूद मात्र अद्याप केलेली नाही. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांना गत अनेक वर्षांपासून पोषण आहार दिला जातो. यामध्ये सातत्याने बदल होत आले आहेत. पोषण आहारामुळे शिक्षकांचेही काम वाढले आहे. आता तर आणखीन नव्या १५ पदार्थांचा यामध्ये समावेश होणार असल्याने शिक्षकांचाही डोकेदुखी पुन्हा वाढणार आहे. पुरवठादाराकडून पदार्थ मोजून घेणे, विद्यार्थ्यांना त्याचे योग्यप्रकारे वाटप करणे अशा प्रकारची अतिरिक्त कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. त्यात आता पुन्हा नव्या जबाबदारीची भर पडणार आहे.
या पदार्थांचा समावेश…
यावर्षीपासून शालेय पोषण आहार आणखीन लज्जतदार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यापूर्वी केवळ खिचडी, वरण-भात, मसाले भात असा मोजकाच पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला जात होता. आता यामध्ये बदल करून व्हेज पुलाव, अंडा पुलाव, मटार पुलाव, मसूर पुलाव, सोयाबीन पुलाव, चवळी, मूग डाळ, मोड आलेली कडधान्ये, गोड खिचडी, केळी व स्थानिक फळे यांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे आता खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत नवीन मेजवानी मिळेल.
शालेय पोषण आहारामध्ये शासनाने नवीन पंधरा प्रकारच्या पदार्थांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार अमंलबजावणी करण्यासाठी लवकरच वरिष्ठाच्या मार्गदर्शनात बैठक होईल. यामध्ये घेतलेल्या निर्णयानुसार पुढील अमलबजावणी केली जाईल.
-बुद्धभूषण सोनवने, शिक्षणाधिकारी प्राथमिक
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 45







