
तिवसा मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील निंभोरा येथील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी घुसल्याने नदीकाठची शेती जलमय झाली आहे. त्यामुळे ऐन मळणीच्या वळणावर असलेल्या सोयाबीनसह अन्य पिकांना जलसमाधी मिळाली असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
भांबोरा नदी म्हणून ओळख असलेल्या या नदीचे गेल्या कित्येक वर्षांपासून खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे पुराचे पाणी वाहून जाण्यास अडसर निर्माण होतो. परिणामी लवकरच नदी ओव्हरफ्लो होऊन नदीपात्रातील पाणी नदीकाठच्या शेतात शिरते. नदीपात्रात वाढलेल्या वनस्पतीमुळेही पाणी वाहून जाण्यास अडचणी येतात. अशावेळी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते, तसेच शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने शेतीची कामे करता येत नाही. पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी निंभोरा येथील अरविंद मावळे, योगेश रहान, सुवर्णा ठाकरे, लक्ष्मण हिमाने,प्रशांत राऊत यांनी केली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







