
परतवाडा : राज्य शासनाने महिलांसह वृद्धांसाठी एसटी महामंडळामार्फत अर्धे तिकीट व मोफत प्रवास योजना सुरू करताच खासगीऐवजी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या चारपट वाढली. दुसरीकडे बसगाड्या न वाढविल्याने प्रवाशांचे हाल सुरू असल्याचे चित्र परतवाडा आगारात आहे. परतवाडा-अमरावती मार्गावर आगाराच्या दिवसभरात होणाऱ्या ७० फेऱ्या आता बसअभावी केवळ अर्ध्यावर आल्या आहेत. त्यात खासगी बेकायदा बसमालकांची बल्ले- बल्ले झाली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक प्रवासी वाहतुकीचा मार्ग व मोठे आगार परतवाडा आहे. या अत्यंत वर्दळीच्या आंतरराज्य महामार्गाने मेळघाटच्या धारणी, चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव, मध्य प्रदेशातील खंडवा, बऱ्हाणपूर, बैतुल या सर्व शहरांकरिता वाहतूक होते. मोठ्या संख्येने प्रवासी परतवाडा येथून पुढे जातात. आगारात पूर्वी जवळपास ७२ बसेस होत्या. नादुरुस्त व कालबाह्य होत आता केवळ ५१ राहिल्या आहेत. त्यातही मेळघाटातील गावे आणि मध्य प्रदेशातील नजीकच्या शहरांकरिता या बस पाठविणे आवश्यक झाले आहे.
१३ हजार प्रवासी, आठ लाख उत्पन्न परतवाडा आगारातून अमरावती-परतवाडा मार्गावर दररोज किमान १२ ते १३ हजार प्रवासी ३५ फेऱ्यांमधून ये-जा करतात. आगाराला दररोज आठ लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न मिळते. पूर्वी प्रवासी संख्या कमी होती. महामंडळापेक्षा खासगी बसचे तिकीट दर कमी असल्याने खासगी बसने प्रवासी जात होते; परंतु आता शासनाच्या महिला सन्मान (अर्धे तिकीट) व वयोवृद्धांसाठी मोफत प्रवास योजनेचा लाभ पाहता, प्रवासी संख्या वाढली. मात्र, बसेसची संख्या घटली आहे. ७५ वर्षावरील मोफत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जवळपास अडीच ते तीन हजार आहे, हे विशेष उल्लेखनीय.
इलेक्ट्रिक बसची प्रतीक्षा महामंडळाच्या बसेस कमी पडत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. आगाराला २० इलेक्ट्रिक चार्जिंग बसेस येत्या दोन महिन्यांत मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
परतवाडा-अमरावती मार्गावर पूर्वी ७० फेऱ्या व्हायच्या. आता ३५ होत आहेत. आगाराला २० चार्जिंग इलेक्ट्रिक बसची प्रतीक्षा आहे. बसेस कमी अन् प्रवासी संख्या वाढलेली, या प्रकाराला यानंतर विराम मिळेल.
– जीवन वानखडे, आगारप्रमुख, परतवाडा
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







