
अमरावती : विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेकरिता केंद्रांवर साहित्याची ने-आण करण्यासाठी जिल्ह्यातील आठ आगारांतून ३२० बसेसपैकी २३५ एसटी बसेस मतदान प्रक्रियेसाठी घेण्यात आल्या होत्या. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रावरील प्रक्रिया सुरू होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बसेस साहित्य घेऊन स्ट्रॉगरूमकडे परतल्या आणि पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे गत दोन दिवसांपासून प्रवाशाची झालेली गैरसोय दूर झाल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी योगेश ठाकरे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांवर साहित्य पोहोचण्यासाठी निवडणूक विभागाने एसटी बसेस, खासगी बसेससह जीप आदी वाहने अधिग्रहित करण्यात आली होती. त्यामध्ये अमरावतीसह अन्य आठ आगारांच्या बसेसचा समावेश होता. या बसेस १९ आणि २० नोव्हेंबरला मतदान साहित्य घेऊन केद्रांकडे रवाना झाल्या होत्या. त्यामुळे आगाराच्या नियमित फेऱ्यांवर परिणाम झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना सहन करावा लागला. अमरावती, बडनेरा, परतवाडा, दर्यापूर, चांदूर बाजार, मोर्शी वरूड आणि चांदूर रेल्वे अशा आठही आगारांकडे एसटी बसेसची संख्या कमी आहे. अशा परिस्थितीत निवडणूक कामी बसेस अधिग्रहित करण्यात आल्याने नियमित फेऱ्यांवर विस्कळीत झाल्या होत्या. १९ आणि २० नोव्हेंबर रोजी अमरावती विभागातील जवळपास ७५ टक्के फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लगाला, बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर केंद्रांवरून साहित्य घेऊन एसटी बसेस स्ट्रांग रूमकडे रवाना झाल्या. रात्री उशिरापर्यंत बसेस आगारात येत होत्या. गुरुवारी सकाळपासून एसटी बसेसच्या नियमित फेऱ्या सुरू झाल्याने एसटी बसेसच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







