
बडनेरा : दुचाकीवरील तिघे वाहतूक नियमांच्या अनुषंगाने गुन्हा असला तरी त्याकडे दुर्लक्षच केले जाते. त्यावर कडी म्हणजे रस्त्याने जाणाऱ्या कुणालाही दुचाकीस्वारांकडून शिवीगाळ केली जाते. मात्र, अशी दांडगाई मोडून काढत बडनेरा पोलिसांनी तिघांना पाठलाग करून ताब्यात घेतले. हा घटनाक्रम मंगळवारी रात्री अमरावती बडनेरा मार्गावर – घडला.पोलिस सूत्रांनुसार, करण उमेश नागरीकर (२६, रा. वल्लभनगर नंबर २), गौरव रमेश आखरे (२२, रा. मारुतीनगर), सौरभ महादेव वाघमारे(२५, रा. रविनगर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांची नावे आहेत. ३ डिसेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास ते एकाच दुचाकीवर भन्नाट वेगाने बडनेरा ते अमरावती मार्गाने जात होते. एका शोरूमजवळ वाहनासमवेत रात्रगस्तीवरील पोलिस चमू हजर होती. या पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत ते पळत सुटले. पोलिसांनी तातडीने वाहनाने पाठलाग करून काही अंतरावर त्यांना गाठले आणि ताब्यात घेतले. बडनेरा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविल्यानंतर समजपत्रावर सोडण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात होत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







